आश्वी: संगमनेर तालुक्याच्या पठार भागात खरशिंदे येथे गुरुवारी सकाळी एका बिबट्याने धुमाकूळ घातला. मात्र, वाडेकरांच्या दगडी वाड्यातील घरात बिबट्या शिरला आणि एका 65 वर्षीय मातेने धैर्य आणि समयसूचकता दाखवून घराचे दार बंद केल्याने तिच्या मुलाचा जीव थोडक्यात बचावला. वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले.
खरशिंदे गावातील हरिभाऊ शिवराम गायकवाड यांच्या घरात सकाळी सातच्या सुमारास बिबट्याने प्रवेश केला. त्या वेळी हरिभाऊंची आई गंगुबाई (वय 65) या दरवाजाजवळ असलेल्या चुलीवर स्वयंपाक करत होत्या. त्याच वेळी दोन फुटांच्या अंतरावरून बिबट्या घरात शिरताना त्यांनी पाहिले. बिबट्या शिरला त्या वेळी हरिभाऊ दरवाजाच्या अगदी जवळ झोपलेले होते. समोर साक्षात काळ उभा असल्याचे पाहूनही गंगुबाई मात्र डगमगल्या नाहीत.
क्षणाचाही विलंब न करता गंगुबाई यांनी आरडाओरडा करत मुलगा हरिभाऊ याला बिछान्यासकट बाहेर ओढले आणि अत्यंत शिताफीने घराच्या दरवाजा ओढून बाहेरून कडी लावून घेतली. आईच्या या समयसूचकतेमुळे बिबट्या घरातच कैद झाला आणि मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे, वन मंडल अधिकारी भाऊसाहेब बोकडे, वनरक्षक रामेश्वर मडपे, रेस्क्यू टीम प्रमुख संतोष पारखे, वनरक्षक पवार, धानापुणे, साळवे, कर्मचारी पोपट गागरे, नजीर शेख, उत्तम भुसारी, गोविंद भुसारी, संजय गागरे, रामदास वर्पे यांनी पथकासह गायकवाड यांच्या घरी धाव घेतली.
बिबट्या घरात बसलेला होता. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाला मोठ्या कसरती कराव्या लागल्या. बिबट्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्यासाठी जवळपास अर्धा तास लागला. या दरम्यान बिबट्या घरामध्ये इकडून तिकडे उड्या मारत लपंडाव खेळत होता. अखेर इंजेक्शनचा प्रभाव पडल्यानंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले.
हा थरार सुरू असताना गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी वन विभागाला मदत केली. यामध्ये संजय गायकवाड, निलेश वाडेकर, मोशीन शेख, रामनाथ वाडेकर, शिवा पंडित, जब्बर शेख, दत्ता पवार, दीपक कोळशे, शाहरुख सय्यद, लहानू पंडित, संजय पंडित, गोरख जगधने, पिर मोहम्मद शेख, संजय भुसारी, मोसिन शेख आणि सोनू पंडित या सर्वांनी सहकार्य केले. बिबट्या जेरबंद झाल्याने खरशिंदे गावासह पठार भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने वन विभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.