पारनेर : जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणत्या राजांनी केल्या. कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही. जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले. निधीसाठी मात्र मागे हटले, अशी टीका जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार किंवा कोणाचेही नाव न घेता केली. तालुक्यातील 49 गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी 1 कोटी 85 लाखांचा निधी दिल्याची माहिती त्यांनी दिली.(Latest Ahilyanagar News)
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा प्रारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. आ.काशिनाथ दाते, आ.शरद सोनवणे, ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते डॉ.सुजय विखे पाटील, मुख्य अभियंता संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे, विजयराव औटी, सचिन वराळ आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले की, 1982 पासून या कालव्यांना निधी मिळाला नाही. अनेकांनी इथे येऊन फक्त भाषणे केली. कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे. च्या गावाला पाणी मिळायचे असेल तर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले आहे.
अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले गेले. पाणी असेल तर विकास आहे. रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली, असा सवालही विखे पाटील यांनी केला. तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहिला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. आ. काशिनाथ दाते, आ.शरद सोनवणे यांचीही भाषणे झाली.