कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेच्या वित्तीय वर्ष 2026-27 अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचा एकच विषयासाठी सर्वसाधारण सभा पार पडली. पालिकेने महत्वाचे निर्णय घेतले. याबद्दल सकारात्मक चर्चा झडली. स्वच्छतेचे काम होत आहे, मात्र अधिक दर्जेदार सुधारणा पुढील महिन्यात दिसतील. ढापे दुरुस्ती, किरकोळ कामांसह काही रस्त्यांचा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पाईपलाईनचे काम पूर्ण करून घेण्यावर भर देण्यात येणार आहे. रस्ते झाल्यानंतर पुन्हा नवीन रस्ते खोदून पाईपलाइन टाकल्यास नुकसान जनतेच्या पैशाचे होते. कामही खराब होते. यामुळे काही काळात हा प्रश्न सोडवला जाईल, अशी भूमिका यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांनी मांडली.
पाण्याबाबत तीस- चाळीस टक्के काम पूर्ण केले आहे. स्वच्छ पाणी शहरात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी भेट घेवून चर्चा केली. यानुसार येत्या काही दिवसात शंभर टक्के शास्ती कर माफीचा निर्णय होणार आहे, असे संधान यांनी स्पष्ट केले.
नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर सर्व पत्रकारांना आसन व्यवस्था उपलब्ध होणे शक्य होणार आहे, अशी भूमिका नगराध्यक्ष पराग संधान यांनी मांडली.
पालिका स्वतःची रुग्णवाहिका लवकरचं खरेदी करणार आहे. नागरिकांना आरोग्याच्यादृष्टीने ती मोलाची ठरणार आहे, असे ते म्हणाले.
नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर कोपरगावातील गोदावरी तट सुशोभीकरण, रिटेनिंग वॉल आदी कामे पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी केली आहे, असे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, नगरसेवक व पालिका अधिकारी उपस्थित होते.
‘महिलांच्या दृष्टीने शहरात सार्वजनिक स्वच्छता गृहांचा प्रश्न महत्वाचा आहे. तो प्राधान्याने सोडविण्यावर भर देत आहे. विश्वासनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. सगळे विषय एकत्र न घेता त्यासाठी टप्प्या-टप्प्याने तरतूद व निर्णयासाठी अनुकूल स्थिती पाहून कार्यवाही करणार आहे.पराग संधान, नगराध्यक्ष, कोपरगाव