जामखेडमध्ये कडकडीत बंद; दोन तास रास्ता रोको Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed Rasta Roko: जामखेडमध्ये कडकडीत बंद; दोन तास रास्ता रोको

साळवे कुटुंबावरील हल्लेखोरांना बारा तासांत अटक करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

जामखेड: रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला होऊन पंधरा दिवस उलटले, तरी यातील आठ आरोपी अद्याप मोकळेच आहेत. या सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा, तसेच त्यांना शिक्षा होईपर्यंत साळवे कुटुंबाला पोलिस संरक्षण द्या, आरोपी अटक न केल्यास यापुढचे आंदोलन नगरला व तेथे न्याय न मिळाल्यास मुंबई निळ्या झेंड्यानी जाम करू, असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी रविवारी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात दिला.

रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक करून मोका अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी आंबेडकर समाजाच्या वतीने रविवारी जामखेड बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (Latest Ahilyanagar News)

यावेळी केदार बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अ‍ॅड.अरुण जाधव, विकी सदाफुले, निखिल घायतडक, प्राचार्य विकी घायतडक, समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे, सुनील जावळे, राजन समिंदर सर, रवी सोनवणे, किशोर कांबळे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष आतिश पारवे,प्रकाश सदाफुले, सचिन सदाफुले, सागर सदाफुले,राजेंद्र सदाफुले, सुरेखा सदाफुले, रोहिणी सदाफुले उपस्थित होते

केदार म्हणाले, साळवे कुटुंबावर झालेला हल्ला हा आंबेडकरी चळवळीवर आहे. सदर गुंड कोणाचे आहेत. हल्ला होऊन पंधरा दिवस झाले तरी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी साळवे कुटुंबाला साधी भेटसुद्धा दिली नाही, याचा खेद वाटतो.

सभापती प्रा. राम शिंदे ढोल वाजविण्यात मग्न आहे, तर आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आयपीएस अधिकारी प्रकरणात सारवासारव करीत ट्वीट करीत आहे. या हल्ल्याबाबत का ट्वीट केले नाही असा सवाल केदार यांनी करून यापुढे असे प्रकार झाले तर जशास तसे उत्तर दिले जाईल.

यावेळी अ‍ॅड. अरुण जाधव म्हणाले, अशा घटना घडत आहेत ही खेदाची बाब आहे. अशा वेळी आपल्या बरोबर कोण येतो, आपल्या दुःखात कोण साथ देतो, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मी 35 वर्षा पासून संघर्ष करीत आहेत. 31 ऑगस्टला आम्ही आमच्या भटक्यांची ताकद दाखवली आहे. साळवे कुटुंबावर झालेला प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना पाठीशी न घालता अटक करा अशी मागणी त्यांनी केली.

प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ जामखेड बंद कडकडीत पाळण्यात आला. तसेच दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नगर बीड रोडच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT