तलावाच्या सांडवा दुरुस्तीकडे दुर्लक्ष  Pudhari
अहिल्यानगर

Nagar Taluka: तलावाच्या सांडवा दुरुस्तीकडे ‘पाटबंधारे’चे दुर्लक्ष!

जागोजागी भगदाड, शिडीची दुरवस्था; पाच वर्षांपासून मागणीला केराची टोपली

पुढारी वृत्तसेवा

वाळकी : नगर तालुक्यातील कामरगाव येथील तलावाच्या सांडवा दुरुस्तीसाठी मागील पाच वर्षांपासून शेतकरी लघु पाटबंधारे विभागाला साकडे घालत आहेत. मात्र, पाटबंधारे विभागाचे शेतकर्‍यांच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराला वैतागलेल्या शेतकर्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

नगर तालुक्यातील कामरगाव, भोरवाडी सीमेवर वालुंबा नदीवर लघु पाटबंधारे खात्यांतर्गत 55 वर्षांपूर्वी मोठा तलाव बांधण्यात आला आहे. तलावामुळे कामरगाव, भोरवाडी व अकोळनेर या तीन गावांच्या पाणी योजना तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या गावांना तलावाखालील असणार्‍या विहिरीमधून बाराही महिने पाणीपुरवठा होतो. शेतीसाठी हा तलाव उपयुक्त असून, सर्वार्थाने जीवनदायी ठरला आहे. (Ahilyanagar News Update)

कामरगाव तलावालगतचा सांडवा पूर्ण निकामी झाला असून, त्याला जागोजागी मोठे भगदाड पडलेले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याने तलावाची सिंचन क्षमता कमी झाली आहे. सांडवा दुरुस्त केला किंवा नव्याने बांधला तर आणखी दोन महिन्यांचा पाणीसाठा वाढू शकतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. सांडवा दुरुस्त झाल्यास तीन गावे टँकरमुक्त होऊ शकतात. मात्र, सांडवा दुरुस्तीच्या कामाकडे पाटबंधारे विभागाचे कायमच दुर्लक्ष होत आहे.

मागील पाच वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे, अ‍ॅड. प्रशांत साठे व गणेश आंधळे सांडवा दुरुस्तीबाबत प्रशासनाला निवेदन देऊन मागणी करत आहेत. मात्र, पाटबंधारे विभाग मागणीकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे तिन्ही गावचे शेतकरी व ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे, अ‍ॅड. प्रशांत साठे, रमेश साठे यांनी लघु पाटबंधारे खात्याच्या सहायक अभियंता ऋतुजा भोसले यांना तीन गावांतील पदाधिकार्‍यांचे व शेतकर्‍यांचे लेखी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, सांडव्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा व ते काम पूर्ण करावे. तसेच तलावाच्या भरावावर चढण्यासाठी शिडी आहे. त्यावरून शाळकरी मुले, शेतकरी व पर्यटक ये-जा करतात. ती शिडी नादुरुस्त असून, तेथे अपघाताची शक्यता वाढली असल्याने तीही दुरुस्त करावी; अन्यथा बुधवारी (दि. 28) कामरगावच्या तलावावरच जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर वसंतराव ठोकळ, भोरवाडीचे सरपंच भास्करराव भोर, अकोळनेरचे सरपंच प्रतीक शेळके, गणेश आंधळे, अ‍ॅड. प्रशांत साठे, केतन साठे, राजेंद्र शिंदे, योगेश पानसरे, रमेश साठे, सुभाष साठे, विक्रम जाधव, अमोल साठे, प्रा. मारुतीराव आंधळे, प्रदीप साठे, नवनाथ ठोकळ, रवी साठे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

उपोषणावेळी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर त्याच ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन आणि प्रसंगी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT