नगर/सोनई/नेवासा: संत परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्य नेवासा येथील ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान मार्गावरील इमामपूर घाटाला आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ अशी नवी ओळख मिळाली आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उद्धव महाराज नेवासेकर, देविदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजुर्के, माजी मंत्री शंकरराव गडाख, ज्ञानेश्वर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख, नंदकिशोर महाराज खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटाचे नामकरण शनिवारी (दि.११ जुलै) करण्यात आले.
सोहळ्यास यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या डॉ. निवेदिता गडाख, रविराज गडाख, मुळा साखर कारखान्याने अध्यक्ष भाऊसाहेब मोटे, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, ज्ञानेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास जाधव यांच्यासह हजारो वारकरी, भाविक उपस्थित होते.
टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. उपस्थितांनी नेवासा भूमीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गौरव केला.
वारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ‘ज्ञानेश्वरी घाट’ हे नाव वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे नवे प्रतीक ठरणार आहे.
उदयन गडाखांचे सुक्ष्म नियोजन
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली इमामपूर घाटाला 'ज्ञानेश्वरी घाट' असं नाव देण्याचं आणि या फलकाच्या अनावरण सोहळ्याचं संपूर्ण नियोजन युवा नेते उदयन गडाख यांच्याकडे होतं. यामध्ये त्यांनी विशेष लक्ष घालून पैस खांबाची प्रतिकृती आणि 'ज्ञानेश्वरी घाट' ही अक्षर असलेला एलईडी फलक स्वतः तयार करुन घेतला. सोहळा यशस्वीतेसाठी उदयन गडाख यांच्यासह यशवंत प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.