Crime News Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagr Crime: प्रेमविवाहाला विरोध; अल्पवयीन मुलीच्या ऑनर किलिंगप्रकरणी आई-वडिलांसह आजीला जन्मठेप

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरासमोर जाळल्याचे न्यायालयात सिद्ध; सरपंच असलेल्या आईसह तिघांना शिक्षा, पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशीचेही आदेश

पुढारी वृत्तसेवा

नगर: प्रेमविवाहाच्या कारणातून अल्पवयीन मुलीचा खून करून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी आई-वडीलांसह आजीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. साईनाथ दिनकर गरड, छाया साईनाथ गरड आणि प‌द्मावती दिनकर गरड (तिघेही रा. शेकटे बु,शेवगाव) अशी शिक्षा सुनावलेल्या तिघांची नावे आहेत. यातील छाया गरड ही घटना घडली त्यावेळी गावची सरपंच होती.

आरोपींनी ७ ऑक्टोबर २०२२ च्या रात्री शेकटे बु, येथे स्वत:च्या अल्पवयीन मुलीचा खुन करून रात्रीच घरासमोर मृतदेह जाळून टाकला. जेथे जाळले तेथील राखही भरून फेकून देऊन पुरावा नष्ट केल्याचे न्यायालयीन सुनावणीत सिध्द झाले. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. कचरे साहेब यांनी तिघांना दोषी धरून जन्मठेप व विविध कलमान्वये प्रत्येकी रूपये साडेआठ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासही सुनावला. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल देवराम ढगे यांनी बाजू मांडली.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी, फिर्यादी प्रियकर व अल्पवयीन मुलीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. ऑगस्ट २०२२ मध्ये दोघांची प्रेमाची माहिती तिच्या आई-वडिलांना झाली. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी प्रियकराला गरड कुटुंबाने घरी बोलावून घेतले. ‘ तू आमच्या मुलीला भेटायचे नाही, तिचा नाद सोडून दे, नाहीतर तुझा काटा काढू,’ अशी धमकी देत मारहाण केली. दुसऱ्या दिवशी पिडित मुलीने प्रियकराला फोनवरून आई-वडील, आजी व मामा लग्नास नकार देत असून आई वडीलांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले. ६ ऑक्टोबरला सरपंच असलेल्या छाया गरड यांनी प्रियकरास फोन करून ‘तू आमच्या मुलीचा विषय सोडून दे. तिचे आम्ही काय करायचे ते करू. इज्जत जाण्यापेक्षा तिला मारून टाकू असे धमकावत त्याचा ठावठिकाणा विचारला.

७ ऑक्टोबरच्या रात्री गावात इज्जत जाईल म्हणून आरोपींनी संगनमत करून पिडीत अल्पवयीन मुलीचा खून केला. घरासमोर रात्री अंत्यसंस्कार करून तिला जाळून टाकले. राख भरून कोठेतरी फेकून देवून पुरावा नष्ट केल्याची फिर्याद प्रियकराने पोलिसांत दिली. शेवगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

सरकार पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, वैद्यकिय अधिकारी, पंच, नोडल ऑफिसर व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाचा आलेला पुरावा व युक्तिवाद ग्राहय धरून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. कचरे यांनी तिघांना जन्मठेप ठोठावली. तर मामाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

आई स्वत: दवाखान्यात गेली, पण...!

मुलीचा खून झाला त्यावेळी तिची आई छाया गरड सरपंच होती. घटना घडल्यानंतर रक्तदाब वाढल्याने ती पती सोबत रात्री डॉ. देशमुख यांच्या दवाखान्यात गेली. पिडीता मुलीने स्वतः विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याचा बचाव करण्यात आला. सरपंच असलेली आई छाया स्वतः साठी दवाखान्यात गेली, पण तेथून आल्यानंतर तिने पिडितेला दवाखान्यात नेले नाही, ही बाब सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

पीआयसह अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र बागुल, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके यांच्यासह ज्या ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्राची छाननी केली. त्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून योग्य ती कारवाई करणेचे आदेशही न्यायालयाने दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT