अतिक्रमणे हटविण्याबाबत ग्रामपंचायतीची उदासीनता Pudhari
अहिल्यानगर

Encroachment Removal: अतिक्रमणे हटविण्याबाबत ग्रामपंचायतीची उदासीनता

कुकडी पाटबंधारे विभागाच्या हालचाली सुरू; संयुक्त मोहीम राबविण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर गावाला अतिक्रमणांचा मोठ्या प्रमाणात विळखा पडला असून, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काही प्रमाणात हटविण्यात आले आहे.

सीना नदीपात्रातील अतिक्रमण हटविण्याबाबत कुकडी पाटबंधारे विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. गाव संपूर्णतः अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले असताना ग्रामपंचायत कार्यालयाला मात्र अतिक्रमणाचे काही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून ग्रामपंचायतबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  (Latest Ahilyanagar News)

जेऊरची मुख्य बाजारपेठ अतिक्रमणात वसलेली आहे. बाजारपेठेमधूनच ससेवाडीला जाण्यासाठी रस्ता आहे. सीना नदीपात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले आहे. त्याचबरोबर जेऊर गावठाण, सीना नदीपात्र ते महावितरण कंपनी चौक रस्ता, जेऊर गावात जाणारा मुख्य रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, वाघवाडी गावठाण, जुनी नगर वाट, बायजामाता मंदिर परिसर, गावांतर्गत असणारे रस्ते याचबरोबर विविध शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जेऊर ते ससेवाडी रस्त्यालगत असणार्‍या अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार सर्वसामान्यांनीच अतिक्रमण हटवले असून, सरसकट अतीक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सीना नदीपात्रातील अतिक्रमणाचा विषय कुकडी पाटबंधारे विभाग दोन श्रीगोंदा यांच्या कार्यालयाकडे गेलेला आहे.

कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांकडून अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात अतिक्रमण दिसून आले आहे. लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडून अतिक्रमणावरील कारवाईबाबत मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. त्यानंतर नदीपात्रातील पूररेषा नियंत्रणांतर्गत येणारे सर्व अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समजली.

अतिक्रमणाचा विषय वर्षानुवर्ष ग्रामसभा, तसेच चौकाचौकात होत आहे. परंतु अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामपंचायत तत्परता दाखवत नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. नाशिक विभागीय आयुक्तांनी ग्रामपंचायतला गावातील अतिक्रमण हटविण्याबाबत आदेश दिले होते. परंतु ग्रामपंचायतकडून अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यापलीकडे काहीही कारवाई होत नसल्याचा आरोपही नागरिकांमधून होत आहे. यामुळे अतिक्रमणधारक बिनदिक्कतपणे अतिक्रमण वाढवतच आलेले आहेत.

जेऊर ग्रामपंचायतने सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, कुकडी पाटबंधारे विभाग, पोलिस प्रशासन, जागतिक बँक प्रकल्प, वन विभाग, आरोग्य विभाग या सर्वांच्या सहकार्याने संयुक्तिक मोहीम राबवून सर्व अतिक्रमण हटवून जेऊरचा कोंडलेला श्वास मोकळा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी

स्थानिक पातळीवरील अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाला मोठे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाने विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या माध्यमातून जेऊर गावाचा श्वास मोकळा करण्यासाठी तत्काळ अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

मोहिमेत सातत्य गरजेचे!

अतिक्रमण हटाव मोहीम गोरगरिबांपुरतीच मर्यादित न राहता जेऊर परिसरातील सर्व अतिक्रमणे सरसकट हटविण्यात यावेत. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी अतिक्रमण हटाव मोहिमेत सातत्य ठेवण्यात यावे. पुन्हा अतिक्रमण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच गावातील धनदांडग्यांचेही अतिक्रमण हटविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT