राजेंद्र बोरसे
श्रीरामपूर : गेल्या चार महिन्यापूर्वी श्रीरामपूर नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात मोठ्या धुमधडाक्यात अतिक्रमण मोहीम सुरू केली, त्याचा जिल्ह्यात गाजावाजाही झाला. यानंतर आठ दहा दिवसानंतर अतिक्रमण मोहीम थंड झाली, ती आजपर्यंत थंडच आहे. अतिक्रमण काढताना लहान व्यवसायिकांवर अन्याय झाला. संगमनेर रोड, नेवासा रोड, मेन रोड या ठिकाणी अतिक्रमण काढले, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण वाढल्याने आता पालिका संबंधितांवर कारवाई करणार का? मुख्याधिकार्यांनी पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला होता, तो पूर्णपणे फोल ठरल्याचे दिसले. (Ahilyanagar news Update )
श्रीरामपुरात काही अतिक्रमणे आहे तशीच आहे. गुरुनानक मार्केटचें अतिक्रमणे आजही उभे आहे. रामनवमी उत्सवावेळी जे अतिक्रमणे हटवण्यात आली होती, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होऊ लागली. दरम्यानच्या काळामध्ये जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा कालवा व चार्यावर झालेली अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले परंतु त्या आदेशालाही जलसंपदा विभागाकडून केराची टोपली दाखवण्यात आली.
वास्तविकतः श्रीरामपूर शहर अतिक्रमण मुक्त करणार, विजेचे पोल, पिण्याचे पाण्याची पाईपलाईन तसेच गटारीचे कामे तातडीने सुरू करणार असे जाहीर केले. याच काळात विस्थापित व्यावसायिकांना बरोबर घेऊन उपोषण करण्यात आले, राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांनी याला पाठिंबा दिला. नगरपालिकेसमोर आंदोलने करण्यात आली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुनर्वसन करण्याबाबत आश्वासन दिले आणि हनुमान मंदिरासमोर पुन्हा टपर्या बसवून अतिक्रमण झाले. त्यानंतर नगरपालिकेच्या अतिक्रमण मोहिमेला अडसर निर्माण झाला.
काही दिवसांनी सय्यद बाबा उरुस व राम नवमी उत्सव सुरू झाला, याच काळात पुन्हा अतिक्रमणे वाढण्यास सुरुवात झाली. मंत्री विखे पाटील यांनी प्रवरा कालवा व कालव्याच्या चार्या अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले. जलसंपदा विभागाने तातडीने अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवल्या परंतु आजपर्यंत कालवा व चारी अतिक्रमण मुक्त झाली नाही. श्रीरामपुरात अनेक चार्यावर हॉटेल, पक्के घरांची बांधकामे तर पाटबंधारे खात्याच्या कालव्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर निवासी वसाहत उभी आहे, या निवासी वसाहतीच्या ड्रेनेज पाईप लाईन थेट कलव्यामध्ये सोडण्यात आल्या आहेत. हेच पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापरले जाते. कालवा व चार्या अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश मंत्री पाटील यांचे असताना जलसंपदा विभागाकडून आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली.
अतिक्रमण मोहीम चालू असताना मेन रोडवरील अतिक्रमण निघणार का ? हा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करत होते. परंतु अहवाल हा विषय न्यायालयात सुरू होता. न्यायालयाचा निकाल अतिक्रमणधारकांच्या विरोधात गेला. अतिक्रमण धारकांनी दुकाने काढण्यासाठी तीन महिन्याची (3 मे पर्यंत) मुदत घेतली. नगरपालिकेने या ठिकाणी कारवाई करत अतिक्रमण काढले. पण दोन दिवसानंतर पुन्हा याच ठिकाणी रस्त्यावर पत्र्याचे कंपाऊंड उभे झाले, याबाबत जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण पाटील सावंत व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या असता कारवाई करण्याचे आश्वासन दिले. संगमनेर रोडवर काही ठिकाणी तोंडे पाहून अतिक्रमण काढली. प्रियदर्शनी मंगल कार्यालयासमोर असलेल्या गाळ्यांच्या शेजारी अनधिकृत टपर्या ठेवली होत्या, मात्र त्या टपर्या आजही उभ्या आहेत. पेट्रोल पंपशेजारी असलेले दुकानही तसेच आहे.
दि. 8 मे रोजी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची भेट घेवून श्रीरामपूर येथील अतिक्रमणाबाबतची माहिती घेतली. पालिकेने रस्त्यावरील अतिक्रमणे हटवताना व्यावसायिकांना हद्द निश्चित करून दिली पाहिजे. आजही अनेक व्यवसायिकांमध्ये संभ्रमावस्था आहे, रस्त्यात असलेले विजेचे पोल, पिण्याचे पाण्याची पाईपलाईन, गटारी याची कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावी, याबाबत पालिकेने त्वरित कारवाई केली पाहिजे, अशा सूचना माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दिल्या.