नगर: जून महिन्यात पावसाने दगा दिला. मात्र, जुलै महिन्यातील पहिला आणि तिसर्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने धरणांची पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे. या महिन्यातील २३ दिवसांत धरणांत १५ हजार ४९०.१९ दलघफू इतकी आवक झाली. त्यामुळे जिल्ह्याचा पाणीसाठा ५४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
यंदा ‘एल निनो’चे सावट आणि पावसाचे प्रमाण कमी होणार असल्यामुळे जिल्हाभरात भीतीचे वातावरण पसरले. जून महिन्यात सरासरी १०८.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना फक्त ६६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पाणलोट क्षेत्रात पाऊस फिरकलाच नाही. त्यामुळे ३० जूनअखेर जिल्ह्यात फक्त २३ टक्के म्हणजे ११ हजार ९०१ दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक होता. लाभक्षेत्रातदेखील पावसाची अशीच परिस्थिती असल्यामुळे खरीप पेरण्यादेखील खोळबल्या होत्या.
मात्र, जुलै महिना सुरु होताच पहिल्याच आठवड्यात अकोले, संगमनेर, पारनेर आदी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. दोन तीन दिवस सुरु असलेल्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढल झाली. जवळपास १० टीएमसीची वाढ झाल्याची नोंद होती.
गेल्या तीन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे भंडारदरा धरणात जवळपास साडेतीन टीएमसी वाढ झाली आहे. मुळा, निळवंडे आदी धरणांत देखील एक टीएमसी पाण्याची आवक झाली.
२३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळा, व इतर पाच लहान धरणांत २७ हजार ३९१ दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. एकूण पाणीसाठवण क्षमतेच्या तुलनेत ५३.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे जुलै महिन्याचा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे.
धरणांतील पाणीसाठा (दलघफू)
भंडारदरा ९२१९, निळवंडे ३५४२, मुळा ११८१३, आढळा १००५, मांडओहळ ५६.१३, घाटशीळ ६८, सीना ७४५, खैरी ९४.८५, विसापूर ८४८.