घारगाव: संगमनेर तालुक्यातील बोटा ते अकोले तालुक्यातील राजूर हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक 21 आहे. हा पठार भागातील गावांसह वाडीवस्तीच्या विकासाच्या दृष्टीने व पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे.
या मार्गावरून 20 गावांचे दळणवळण आहे. यापूर्वी रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने आज मोठ मोठे खड्डे पडून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तर उप रस्त्यांचीही दुर्दशा आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने हा रस्ताच पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. (Latest Ahilyanagar News)
बोटा ते ब्राह्मणवाडा रस्त्याच्या दयनीय अवस्थेने या मार्गावरील अनेक प्रवासी बसेस बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. शेतकर्यांचा शेतमाल विक्रीला नेताना देखील विविध अडी अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्यांच्या अडचणीमुळे पठार भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.दळणवळणाच्या दृष्टीने रस्ताच धड नसल्याने अनेक गावे विकासापासून मागासलेली असून पठार भागातील गावांचा विकासच खुंटला आहे.
बेलापूर ते बोटा हा राज्यमार्ग रस्ता अकोले सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अंतर्गत येत आहे. या रस्त्याचे पावसाळा सुरू होण्यापूर्वी डागडुजी होणे, झाडे झुडपे काढणे, साईट पट्टी भरणे, दिशादर्शक फलक लावणे आवश्यक होते.
परंतु ती कामे झाली नाही. यात काही किलोमीटर रस्त्याचे काम झाले. परंतु ते देखील निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे पहिल्याच पावसात समोर आले आहे. या रस्त्यावरील साईड पट्टी, साईड गटारांचे काम न केल्याने पावसाळ्यात अक्षरशः रस्त्यावरून ओढ्यासारखे पाणी वाहून गेल्याने या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.तर काही ठिकाणी रस्त्यासह साईट पट्टी वाहून गेली आहे. तर खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने या रस्त्याला तळ्यांचे स्वरूप आले आहे.
बोटा, बेलापूर, बदगी,चैतन्यपूर, भक्ताचीवाडी, ब्राम्हणवाडा, जांभळे,मोघाडवाडी, भोजदरी, जाचकवाडी, पवारवाडी, म्हसवंडी, आंबी दुमाला, कुरकुटवाडी, करंडी, मन्याळे, कळंब ,पवारवाडी, गोपाळवाडी, मोघडवाडी या गावांसह अनेक वाडी-वस्तीवरील नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, महिला, प्रवासी, वाहनधारक, चालक या मार्गावरून प्रवास करताना खास्ता खात, शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करत अनेक अडचणींना सामोरे जात आहे. या मार्गावरील शेतकर्याचे दूध, भाजीपाला, शेतमाल पुणे, मुंबई, नाशिक सारख्या मोठ्या औद्योगिक शहरांच्या बाजारपेठेत नेत असताना आदळ आपट करत शेतमाल वेळेत न पोहचल्याने शेतकर्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.!
बोटा ते राजूर या राज्यमार्गाचे दुपदरीकरण करण्यात यावे.या मागणीसाठी विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून घारगाव ते अकोले तब्बल 54 किलोमीटर 3 दिवसांच्या मुक्कामासह पायी प्रवास करत मागणी करण्यात आली होती.सबंधित मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी यांना देऊनही मागणी पूर्ण करण्यात आली नाही.
या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी मोठे जनआंदोलन सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांचे दालनात करण्यात येणार असल्याचा इशारा समाजसेवक भगवानदादा काळे, पूजा सोनवणे, युवा नेते योगेश फापाळे, सदस्य संतोष शेळके, सरपंच जालिंदर गागरे, चंद्रकांत गोंदके, रामभाऊ शेळके, बाळासाहेब कुरकुटे, योगेश महाले, यशवंत शेळके, अमित शेळके, योगेश महाले, विलास शेळके, प्रवीण महाले, गणेश फापाळे, किसन भोईटे, राहुल लांडे यांनी इशारा दिला आहे.