भेंडा: फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्याच्या प्रारंभीच तालुक्याच्या पूर्व भागातील भेंडा, कुकाणा, चिलेखनवाडी, तेलकुडगाव, देडगाव भागातील बहुतेक सर्वच विंधन विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याचे स्त्रोत झपाट्याने कमी झाले आहेत. परिणामी ऊस ,भुईमूग ,कांदा, केळी, पालेभाज्या, चारा पिके धोक्यात आली आहेत.
यावर्षीच्या पावसाळ्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली त्यात प्रचंड प्रमाणात पाणी वाहून गेले. त्यानंतर एक-दीड महिना पिके पाण्याखाली होती. शेती लवकर वापशावर येत नव्हती. असे असूनही यावर्षीच्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच अनेक ठिकाणी कूपनलिकांवरील पंप, विहिरीचे कृषिपंप पाणी पातळी कमी झाल्याने बंद पडले आहेत. आंतरवाली, सुकळी, नांदूर शिकारी, तरवडी, गेवराई, गोंडेगाव, चिंचोली, भेंडा खुर्द, भेंडा बुद्रुक ,सौंदाळा, नागापूर, देवगाव, जेऊर हैबती, देवसडे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
मुळा कालव्याचे आवर्तन ज्या भागात चालू आहे, त्या भागात थोडी बरी परिस्थिती आहे. मात्र, अद्याप ज्या भागात पाणी सुटणे बाकी आहे, त्या भागात मात्र अतिशय भयानक परिस्थिती पाण्याबाबत झाली आहे. अनेक ठिकाणी सौरऊर्जा पंप बसविल्याने पाण्याचा उपसा सतत चालूच आहे. तसेच प्रदूषणाचे दुष्परिणाम म्हणून फेब्रुवारीच्या प्रारंभी पासूनच कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळेच या पुढील एप्रिल व मे उन्हाळ्याचे दोन महिने कसे जाणार? हा प्रश्न सतावत आहे. अतिशय मोठा खर्च करून अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडी केल्या.