श्रीरामपूर: राज्यात बंदी असलेली शेतीसाठीची अनेक औषधे तालुक्यात सर्रास विकली जात असल्याचे पुढे आले आहे. त्याबाबत तक्रारी करूनही कृषी विभागाने दखल घेतली नव्हती, असे आरोप आहेत.
तथापि, याबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने नामांकित २७ कंपन्यांच्या त्या ३५० प्रचलित औषधांची विक्री बंद करण्याचे आदेश काढले आहेत. तालुका फर्टिलायझर व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना हा आदेश पाठवला आहे.
जैव उत्प्रेरक औषध निर्मिती व विक्रीवर बंदी घातलेल्या कंपन्याची औषधे सर्रास शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. ही बाब शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी तालुका कृषी अधिकारी व गुणनियंत्रण अधिकाऱ्यांना धारेवर धरत निदर्शनास आणून दिल्यानंतर कृषी विभाग खडबडून जागे झाले आहे.
श्रीरामपूर तालुका गुणनियंत्रण कृषी अधिकारी अभय थोरात व तालुका पंचायत समिती गुणनियंत्रण कृषी अधिकारी ए. आर. खोडकर यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढले आहे. त्यानुसार कार्यालयाकडे विक्रीसाठी बंदी असलेल्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची अंतरिम यादी प्राप्त झालेली आहे.
प्राप्त यादीनुसार ज्या (जैव उत्प्रेरक) औषध कंपन्यांना खत नियंत्रण आदेशानुसार उत्पादन विक्री करण्यासाठी परवाना प्राप्त झालेला आहे, अशा औषध कंपन्यांचीच विक्री करावी. व विक्रीसाठी परवाना नसलेल्या औषध कंपन्यांची विक्री करू नये. तसेच परवाना नसलेल्या औषध कंपन्यांचा साठा (निविष्ठा) आढळून आल्यास, खत नियंत्रण आदेशनुसार गंभीर स्वरूपाची कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, अशा इशार कृषी खात्याने दिला आहे.