

नगर: शहरातील प्रभाग पंधराअंतर्गत येणाऱ्या आगरकर मळा परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा गंभीरपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेविका गीतांजली काळे, नगरसेवक दत्ता गाडळकर, नगरसेविका पौर्णिमा गव्हाळे आणि नगरसेवक सुजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी सुनील काळे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, विजय गायकवाड, महेश सुपेकर, प्रसाद कुकडे, कल्पना भळगट, पूजा चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
आगरकर मळा परिसरातील नागरिकांना सध्या अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक घरांपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचत नाही. याशिवाय पाणी सोडण्याच्या वेळा पूर्णपणे अनियमित झाल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
कधी पहाटे तर कधी मध्यरात्रीनंतर पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना रात्रभर जागून पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या कुटुंबांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
गेल्या काही महिन्यांपासून परिसरातील पाणीप्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. कमी दाबाने होणारा पुरवठा, अनियमित वेळापत्रक आणि अनेक भागांमध्ये पुरेसे पाणी न पोहोचणे यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या प्रश्नाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचेही स्थानिक नगरसेवकांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाकडे यापूर्वीही अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. तसेच, पंधरा दिवसांपूर्वीही प्रशासनाला परिस्थितीची कल्पना देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस सुधारणा न झाल्याने नागरिकांच्या असंतोषात वाढ झाली. परिसरातील नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
आंदोलनानंतर शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन परिसरातील पाणीपुरवठ्याच्या समस्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्तांनी संबंधित प्रश्नाची दखल घेत 15 दिवसांच्या आत तो मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच, गजानन कॉलनी परिसरातील संपवेल येथे नवीन मोटार बसविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.