संगमनेर: खरीप हंगाम सुरू झाल्याने तालुक्यातील व राज्यातील शेतकर्यांना शेतीसाठी युरियाची गरज आहे. शासनाने शेतकर्यांच्या मागणीचा विचार करून बफर स्टॉकमधून 50 टक्के युरिया रिलीज करून शेतकर्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केली.
माजी मंत्री थोरात यांनी याबाबतचे पत्र महाराष्ट्र सरकारला दिले आहे. हे पत्र तालुका कृषी अधिकारी रजा बोडके यांनी स्वीकारले असून हे निवेदन सतीश खताळ व नामदेव शिंदे यांनी दिले आहे. (Latest Ahilyanagar News)
सध्या राज्यात सर्वत्र खरीप हंगाम सुरू आहे. पेरणीसाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. अशा काळामध्ये शेतकर्यांना युरियाची मोठी आवश्यकता आहे. मात्र सर्वत्र युरियाच्या टंचाईला शेतकर्यांना सामोरे जावे लागत आहे.
संगमनेर तालुक्यातही सर्वत्र पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात युरिया गरज आहे. तालुक्यात शासनाने युरियाचा साठा करून ठेवला असल्याने शेतकर्यांना युरिया मिळण्यात मोठी अडचण होत आहे त्यामुळे शासनाकडे असलेल्या बफर स्टॉकमधून तातडीने 50टक्के युरिया रिलीज करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.
निवेदन दिल्यानंतर कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी तातडीने कार्यवाही करून युरिया रिलीज करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवकाळी पाऊस किंवा कोणतेही संकट आले, तरी कायम शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहे. शेतकर्यांचे विविध प्रश्न सातत्याने सरकार दरबारी मांडले असून न्याय मिळवून दिला आहे. शेतकर्यांना युरियाची टंचाई जाणवत असून युरिया मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.माजी मंत्री बाळासाहेब थोरात