निळवंडे विसरावे म्हणून भोजापूरचा गाजावाजा – बाळासाहेब थोरातांचा विखेंवर अप्रत्यक्ष टोला Pudhari
अहिल्यानगर

Balasaheb Thorat: निळवंडे विसरावे म्हणून भोजापूरचा गाजावाजा – बाळासाहेब थोरातांचा विखेंवर अप्रत्यक्ष टोला

भोजापूर चारीच्या माध्यमातून झालेल्या विकासाचा उल्लेख; उपसा जलसिंचन योजना तातडीने सुरू करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर : कारखान्याच्या माध्यमातून भोजापूर चारी निर्माण करण्यात आली. दरवर्षी पाणी देण्यासाठी प्रयत्न केला. यावर्षी जास्त पाऊस झाल्याने पाणी आले. हे एका वर्षात झाले नाही. ज्यांचे योगदान नाही ते लोक आता बोलत आहेत. निळवंडेचे काम जनतेने विसरावे म्हणून भोजपुरचा बोलबाला केला जात असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. आपण मंजूर केलेल्या उपसा जलसिंचन योजनांची स्थगिती रद्द करून तातडीने कामे सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.(Latest Ahilyanagar News)

पिंपळे येथे विविध सहकारी सेवा सोसायटीच्या लोकार्पण प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते, तर व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील घुले, आर्किटेक बी.आर चकोर, अजय फटांगरे, महंत बुवाजी बाबा पुणेकर, महंत बबनराव सांगळे, संपतराव गोडगे, धनराज गुट्टे, संजय फड, ॲड ज्ञानेश्वर सांगळे, सुभाष सांगळे,रोहिदास सानप, ज्ञानेश्वर सानप, देवराम गुळवे, जनार्दन कासार, त्रंबक गडाख, डॉ. दत्तात्रय गडाख, साहेबराव गडाख, रमेश सानप, पांडुरंग फड , सखाराम शर्माळे, सोसायटीचे अध्यक्ष शिवनाथ कोटकर, सरपंच मीनाताई कोटकर आदी उपस्थित होते.

माजी मंत्री थोरात म्हणाले की, यावर्षी मे महिन्यापासून चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे पाणी आले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून भोजापुर चारी निर्माण झाली. ते स्वतः भर उन्हात चारी कामावर येऊन बसायचे. भोजपूर चारी 1992 मध्ये कारखान्याने 82 लाख रुपये खर्च करून तयार केली. मंत्री पदाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळा निधीचारीसाठी टाकला आणि पाणी दरवर्षी पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न आपण केले. यावर्षी पाऊस चांगला झाला, या आनंदाची गोष्ट आहे ही चारी मागील एक वर्षात झाली नाही. ज्यांना कधी चारी माहीत नव्हती ते आता येऊन भाषण करत आहेत. निळवंडे धरण जनतेने विसरावे म्हणून भोजापूरचा बोलबाला करत आहे.

या भागाला पाणी मिळावे याकरता आपण सातत्याने प्रयत्न केला असून निळवंडे कालव्यांमधून उपसा जलसिंचन योजना मंजूर केल्या होत्या. यामध्ये निमोन, पळसखेडे, कऱ्हे, नान्नज दुमाला, सोनोशी, काकडवाडी, पारेगाव बुद्रुक, पारेगाव खुर्द, तळेगाव, तिगाव, बिरेवाडी यांच्यासह 11 गावांचा समावेश आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर या मंडळीने उपसा जलसिंचन योजना रद्द केल्या. या उपसा जलसिंचन योजनेतून या भागाला पाणी देणे शक्य आहे त्यासाठी आपण नियोजन केले होते त्यामुळे तातडीने त्या सुरू कराव्यात. जे काम होईल, त्याबाबत आपण नेहमी बोललो.

यावेळी खासदार वाकचौरे, ॲड.माधवराव कानवडे, बी.आर चकोर आदींनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजेंद्र कहांडळ व अनिल घुगे तर सोसायटीचे अध्यक्ष शिवनाथ कोटकर यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT