नगर तालुका: शिक्षणाचा पाया प्राथमिक शाळेतच भक्कम होत असतो. बालवयात विद्यार्थ्यांवर झालेले संस्कार आणि मिळालेले दर्जेदार शिक्षण त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची दिशा ठरवते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मतदारसंघातील प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अक्षय कर्डिले यांनी सांगितले.
बहिरवाडी येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाथकृपा ट्रॅव्हल्सचे संचालक बापू दारकुंडे व प्रवीण कुलकर्णी यांच्या पुढाकारातून वाकी वस्ती, बहिरवाडी व वाघवाडी येथील शाळांमधील इयत्ता चौथीच्या ३१ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. आमदार कर्डिले यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.
विद्यार्थ्यांना पुढील माध्यमिक शिक्षणासाठी जेऊर येथे जावे लागते. ग्रामीण गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण येऊ नये, या उद्देशाने सायकलींचे वाटप करण्यात आल्याची माहिती बापू दारकुंडे यांनी दिली. गेल्या वर्षीही त्यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले होते. यापुढेही गरजू विद्यार्थ्यांना सायकली तसेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे बापू दारकुंडे यांनी सांगितले.
आमदार कर्डिले म्हणाले, गावांतर्गत रस्ते गावाच्या विकासातील महत्त्वाचे घटक असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. छत्रपती संभाजीनगर महामार्गापासुन जेऊर ते कोल्हार घाट रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेता या रस्त्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. बापू दारकुंडे व प्रवीण कुलकर्णी यांच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाचे आमदार अक्षय कर्डिले यांनी कौतुक केले.
याप्रसंगी सरपंच अंजना येवले, रोहिणी आठरे, ज्योती तोडमल, मधुकर मगर, राजू दारकुंडे, मधुकर पाटोळे, सुनील पवार, लक्ष्मण ससे, राजेंद्र ससे, शंकर बळे, बाबासाहेब तोडमल, बंडू पवार, राजू तोडमल, दिनेश बेल्हेकर, आप्पा बनकर, उद्धव मोकाटे, बाजीराव आवारे, मच्छिंद्र आवारे, शिवाजी काळे, शिवाजी मोकाटे, विकास कोथिंबीरे, आदिनाथ बनकर, इंद्रभान विरकर, शहाराम बेरड, सावळेराम चव्हाण, संजय येवले, केंद्रप्रमुख नितीन दळवी, तुकाराम दारकुंडे, संजय दारकुंडे, धनराज गुंड उपस्थित होते.