Ashutosh Kale Pudhari
अहिल्यानगर

Ashutosh Kale: ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व तलाव भरून घ्या; आ. आशुतोष काळे यांची मागणी

यंदा एल निनोचे सावट असल्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला होता.

पुढारी वृत्तसेवा

कोळपेवाडी: गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव तालुक्यातील सर्व पाझर तलाव, गावतळे, बंधारे आणि ओढे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

यंदा एल निनोचे सावट असल्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला होता.

त्या अंदाजाप्रमाणे जून महिना कोरडाठाक गेल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी देखील झपाट्याने कमी झाल्यामुळे काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीला वरूण राजाने राज्याच्या विविध भागासह धरणक्षेत्रात दमदार हजेरी लावल्यामुळे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीला ओव्हरफ्लोचे पाणी सोडले होते.

त्यावेळी ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी कालव्यांना सोडावे, अशी मागणी आ. काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे.

सध्या जरी संततधार पाऊस सुरू असला तरी हवामान खात्याने यंदा पाऊस कमी पडण्याचा दिलेला अंदाज आणि अल निनोचा धोका लक्षात घेऊन पुढील पाणी टंचाईच्या नियोजनासाठी आत्ताच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर सोयाबीन, बाजरी, मका, कापूस आणि भुईमूग यांसारख्या विविध खरीप पिकांची पेरणी केली आहे. जर आगामी काळात खरीप पिकांसाठी आवश्यक पर्जन्यमान झाले नाही तर खरीप हंगाम धोक्यात येवून अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात.

मागील चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागांसह धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला सुरु असलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदार संघातील सर्व पाझर तलाव, गाव तळे, बंधारे आणि ओढे पूर्ण क्षमतेने भरून देण्याच्या सूचना आ. काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.

गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला सोडलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून तालुक्यातील सर्व पाझर तलाव, गावतळे, बंधारे आणि ओढे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत जेणेकरून जून महिना कोरडा गेल्यामुळे खालावलेली भूजलपातळी भरून निघण्यास काही प्रमाणात का होईना मदत होणार असल्याचे आ. काळे यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT