मंचर: आंबेगाव तालुक्यातील कळंब हे ’द्राक्षाचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाते. मात्र, यंदा मे-जून महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे येथील द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक द्राक्षबागा नुकसानग्रस्त झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Latest Ahilyanagar News)
कळंब, चांडोली बु., नागापूर, पारगाव आणि घोडेगाव परिसरातील द्राक्षबागांमध्ये पावसामुळे फळगळ, घडसड व रोगराई वाढल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या पथकाकडून तालुकास्तरीय पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. डॉ. सहदेव रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी पार पडली.
छाटणीपासून ते काढणीपर्यंत एका एकराला सुमारे 3 ते 4 लाख रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. उत्पादन घटल्याने अनेकांचा हंगाम वाया गेला असून, शासनाने तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.
या पाहणीवेळी उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, उपकृषी अधिकारी नमिता राशिनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, कळंब द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष दिलीप वऱ्हाडी, नीलेश कानडे, राजेंद्र कानडे, अविनाश थोरात, नवनाथ कानडे, महेश कानडे, महेंद्रनाथ कानडे, तुषार थोरात, एकनाथ कानडे आदी उपस्थित होते.
सततच्या पावसामुळे आमच्या द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. घड तयार होण्याआधीच पिकं सडली. खर्च वाया गेला आणि उत्पन्न शून्य राहिलं. सरकारने आम्हाला तातडीची आर्थिक मदत द्यावी.अनिल कानडे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कळंब