अकोले : मिशन सुधार अभियानांतर्गत अकोले तालुक्यात शिधापत्रिकांमधून तब्बल 5327 शिधापत्रिकाधारकांची नावे कमी करण्यात आली आहेत. 35547 लाभार्थ्यांपैकी लँड होल्डिग, धान्य न घेतलेले, आधार कार्ड संशयित, इन्कम ग्रुप, डुप्लिकेट रेशनकार्ड असे तब्बल 5327 शिधापत्रिकाधारक लाभार्थी कमी केल्याची नोंद पुरवठा विभागात करण्यात आली आहे. मिशन सुधार अभियानांतर्गत शिधापत्रिकांमधील मृत, दुबार व संशयास्पद लाभार्थीना वगळण्याचे काम प्रगती पथावर आहे.
मिशन सुधार अभियानांतर्गत शिधापत्रिकांमध्ये मृत, दुबार, संशयास्पद लाभार्थी वगळण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शासनाद्वारे पुरवठा विभागाला अशा 35 हजार 547 लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. आता पुरवठा विभागासह ग्रामविकास अधिकारी (तलाठी) शिधापत्रिकांची तपासणी करीत आहेत. दरम्यान, नावे वगळण्याचे अंतिम अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
ऑनलाइन प्रणालीमुळे लाभार्थ्याला पॉस मशीनवर अंगठा देणे अनिवार्य आहे. राज्यभर ‘मिशन सुधार अभियान’ राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीच्या आधारे संशयास्पद लाभार्थीची यादी केली आली आहे. या यादीतील लाभार्थ्यांची पडताळणी होत आहे. केंद्र सरकारने शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी राज्यातील आधार व सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीचा आधार घेण्यात आला आहे. यानुसार राज्यातील 88.58 लाख लाभार्थी संशयास्पद आढळले आहेत. या नावांची पडताळणी होत आहे. यामुळे रेशन वितरणात पारदर्शकता येऊन, गरजू लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळणार आहे, मात्र प्राधान्य गट व अंत्योदय शिधापत्रिकाधारक योजनेसाठी पात्र आहे की नाही, याचेही सर्वेक्षण यापूर्वी करण्यात आले. त्यावेळी अनेक नावांवर काट मारण्यात आला. आता मिशन सुधारच्या माध्यमातून पुन्हा एकदा असे लाभार्थी रडारवर आहेत. या पार्श्वभूमीवर संशयास्पद लाभार्थीच्या माहितीत तथ्य आढळल्यास ती नावे वगळण्याची शिफारस तहसीलदारांकडे केली जाते.
प्राधान्य गट आणि अंत्योदय शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यासाठी मिशन सुधार अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून दुबार, मृतक व संशयास्पद लाभार्थ्यांची नावे रद्द केली जाणार आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांचा आकडा आणखी कमी होणार आहे. शासनाकडून प्राप्त यादीच्या आधारे अकोले तालुक्यातील यादीतील लाभार्थीची पडताळणी होत आहे. सत्यता आढळल्यास ती नावे कमी केली जात आहेत.संदीप निळे, तालुका पुरवठा निरीक्षक अधिकारी, अकोले
धान्य उचल, वार्षिक उत्पन्नाची पडताळणी प्राधान्य गटातील शिधापत्रिकेवर एका कुटुंबाला माणसी 5 किलो धान्य दिले जाते. गहू व तांदळाचा यात समावेश असतो. पुरवठा विभाग धान्य उचल व वार्षिक उत्पन्नाची पडताळणी करीत आहे. यामध्ये संशयास्पद लाभार्थी आढळल्यास कारवाई केली जात आहे. मिशन सुधार अभियानच्या शेवटच्या टप्प्यात शिधापत्रिकाधारकांची अंतिम यादी तयार केली जाईल. त्यानंतर संशयास्पद नावे वगळण्याचा अधिकार तहसीलदारांकडे राहणार आहे. एकूणच या अभियानातून मृत, दुबार व संशयास्पद लाभार्थ्यांच्या नावावर फुली मारली जाणार आहे.