पाथर्डी: मानवता हाच सर्वात मोठा धर्म मानणारे आणि लोकांमधले लोकांसाठी जगलेले नेतृत्व म्हणजे अजितदादा होत, असे व्यक्तिमत्त्व युगा-युगांनी घडते. त्यांनी आयुष्यभर शिस्त, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेचा मार्ग अवलंबला; कोणत्याही गुन्हेगाराला कधीही पाठीशी घातले नाही, अशी त्यांची ठाम भूमिका होती. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मोठी असली तरी त्यांनी दाखवलेला आदर्श प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन आमदार शिवाजी गर्जे यांनी केले.
पाथर्डी येथे सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या वतीने गोरे मंगल कार्यालयात आयोजित शोकसभेत ते बोलत होते.आमदार गर्जे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शोक सभेमध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले, गोकुळ दौंड, शिवशंकर राजळे, भीमराव फुंदे, भगवान दराडे, विष्णूपंत ढाकणे, बंडू पाटील बोरुडे, बाळासाहेब ताठे, सविता भापकर, मनीषा डांभे, अर्जुन धायतडक, रणजित बेळगे, धन्यकुमार गुगळे, संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, पप्पू बोर्डे, सीताराम बोरुडे, दिगंबर गाडे, विष्णूपंत पवार, विक्रम चव्हाण, महेंद्र शिरसाट, भगवान बांगर, सचिन नागापुरे, भोरु म्हस्के, अँड.अंकुश गर्जे, हुमायून आतार, राहुल ढाकणे, गणेश पालवे, दत्तात्रय खेडकर, महेश अंगरखे, सचिन नागापुरे उपस्थित होते.
गर्जे म्हणाले, अजित पवार हे शाहू-फुले-आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वसमावेशक व सेक्युलर विचारसरणीवर चालणारे नेतृत्व होते. स्व. वसंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी वारशाला पुढे नेणारा हा नेता केवळ राज्याचाच नव्हे, तर देशाचाही मोठा तोटा करून गेला आहे. अजितदादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. अजित दादा हे जमिनीवर राहून काम करणारे नेते होते. सर्वसामान्यांशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती.
पहाटेपासून जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या समस्या ऐकून शेवटच्या माणसाचे काम होईपर्यंत ते स्वस्थ बसत नसत. शासनाच्या माध्यमातून त्यांनी राबविलेली विकासकामे ही नियोजनबद्ध, दर्जेदार आणि टिकाऊ स्वरूपाची असत. कामाचा धडाका आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांची खरी ओळख होती. त्यांची आठवण चिरंतन राहावी, यासाठी पाथर्डीत भव्य स्मारक अथवा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करू.
चंद्रशेखर घुले म्हणाले, राज्यातील प्रत्येक तालुका, प्रत्येक गाव आणि त्या गावातील कार्यकर्ता त्यांना नावासकट परिचित होता. कोणत्या कार्यकर्त्याने कोणत्या भागात काय काम केले, कोणत्या मतदारसंघात कोणती अडचण आहे, याची त्यांना अचूक जाण होती. ही केवळ राजकीय माहिती नव्हती, तर ती एक जिव्हाळ्याची नाळ होती. माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघातील अनेक विकासात्मक आणि धोरणात्मक कामांसाठी त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य केले.