नगर: अकोले, पारनेर, संगमनेरपाठोपाठ अहिल्यानगर तालुक्यात देखील पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या तालुक्यातील ससेवाडी, बहिरवाडी व इमामपूर या तीन गावांना टँकर मंजूर करण्यात आले आहेत. सध्या बहिरवाडी व इमामपूर या दोन गावांसाठी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 14 गावे आणि 47 वाड्यांसाठी 12 टँकर धावत आहेत.
सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यास जानेवारी -फेब्रुवारी महिन्यातच काही तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा सुरू होतात. गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. अशा परिस्थितीत नेहमीप्रमाणे संगमनेर, अहिल्यानगर, अकोले, पारनेर आदी तालुक्यांत मार्च - एप्रिल महिन्यांत पाणीटंचाई निर्माण होते.
त्यानुसार मार्च महिन्यात पहिल्यांदाच अकोले तालुक्यात टँकर सुरू झाला. त्यानंतर पारनेर तालुक्यात टँकरची मागणी झाली. गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वीच संगमनेर तालुक्यात टंचाई परिस्थिती तीव्र झाली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयात ससेवाडी, इमामपूर आणि बहिरवाडी आदी तीन गावांकडून टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल झाले.
प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी या तीन गावांसाठी टँकर मंजुरीचे आदेश जारी केले. त्यानुसार बुधवारपासून बहिरवाडी व इमामपूर या दोन गावांसाठी टँकर सुरू झाले आहेत. या दोन गावांतील 2 हजार 140 लोकसंख्येसाठी एक टँकर धावत आहेत. गेल्या वर्षी याच तालुक्यात 6 टँकर धावत होते.
गेल्या वर्षी 38 टँकरची नोंद
गेल्या वर्षी 9 एप्रिल 2025 रोजी पारनेर शहरासह पारनेर तालुका, संगमनेर, अहिल्यानगर, पारनेर पाथर्डी या चार तालुक्यांत 38 टँकर सुरू होते. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील सर्वाधिक अकरा तर पारनेर शहरातील चार टँकरचा समावेश होता. पारनेर शहरातील पाच हजार लोकसंख्येचा एप्रिल महिन्यातच घसा कोरडा पडला होता.