नगर: विधान परिषदेच्या अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.25) एकही अर्ज दाखल झाला नाही. मात्र, प्रीती सत्यजित कदम यांच्यासह नऊ जणांनी 16 उमेदवारी अर्ज नेले आहेत.
अहमदनगर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा टप्पा सोमवारपासून (दि.25) सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवडणूक यंत्रणा सज्ज होती.
मात्र, पहिल्या दिवशी उमेदवारी घेण्यासाठीच इच्छुक उमेदवार वा उमेदवारांचे समर्थक आले होते. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे भाजपचे विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित चंद्रशेखर कदम यांच्या पत्नी प्रीती सत्यजित कदम दहा नगरसेवकांचा ताफा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या. त्यांनी नगराध्यक्ष कदम यांच्यासाठी दोन अर्ज घेतले.
याशिवाय देवळाली प्रवरा येथील संतोष एकनाथ चोळके यांनी दोन, मनीषा सूर्यकांत कदम यांनी दोन अर्ज नेले. अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथील भाऊसाहेब रामदास शिंदे, अरणगाव येथील शिवाजी शिंदे, घोडेगाव येथील सुधीर वैरागर, पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील प्रवीण दळवी यांनी प्रत्येकी एक अर्ज घेतला आहे. अहिल्यानगरातील सावेडी येथील आशिष शेलार यांनी चार, तर शेवगाव येथील कमलेश हस्तीमल गांधी यांनी दोन उमेदवारी अर्ज घेतले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवशीच उमेदवारी अर्ज दाखल होण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे.
भाजप निश्चितच न्याय देईल: प्रीती कदम
कदम घराणे कुटुंब तीन पिढ्यांपासून भाजपशी एकनिष्ठ असून, चंद्रशेखर कदम हे भाजपचे निष्ठावंत नेते आहेत, असे स्पष्ट करत प्रीती सत्यजित कदम यांनी त्यांची भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की यापूर्वी राहुरी विधानसभेसाठी सत्यजित कदम इच्छुक होते; मात्र पक्षादेशाला प्राधान्य देत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. या वेळी भारतीय जनता पक्ष मूळ निष्ठावंत कार्यकर्ते सत्यजित कदम यांना निश्चितच न्याय देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या निवडणुकीसंदर्भात सत्यजित कदम यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याचे देवळाली प्रवरा पालिकेचे भाजप गटनेते प्रकाश संसारे यांनी सांगितले.