नगर: जिल्ह्यात गुरुवारी (दि.2) झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने अकोले, कोपरगाव, राहाता, संगमनेर, राहुरी, शेवगाव, जामखेड व पारनेर या आठ तालुक्यांतील 127 गावांना तडाखा बसला आहे. या तडाख्यात 4 हजार 797.16 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. याचा आर्थिक फटका 7 हजार 384 शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानीचा फटका राहुरी तालुक्यात सर्वाधिक 1 हजार 780 हेक्टर पिकांना बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा कहर सुरुच असून, गुरुवारी (दि.2) कृषी विभागाने अवकाळी पावसाने झालेल्या रब्बी पिके आणि फळबागांच्या नुकसानीची पाहणी करुन शासनाला प्राथमिक अहवाल पाठविला आहे. या अहवालानुसार अकोले तालुक्यातील 32 गावे, कोपरगाव तालुक्यातील 24, संगमनेर तालुक्यातील 18, जामखेड तालुक्यातील 20, राहुरी तालुक्यातील 14, पारनेर तालुक्यातील 6 तर राहाता तालुक्यातील 11 गावांना अवकाळीचा फटका बसला आहे.
या पावसाने मका, भाजीपाला, कांदा, गहू, बाजरी, हरभरा, भुईमूग आदी पिकांबरोबरच डाळिंब, केळी, पेरू, द्राक्षे, आंबा आदी फळबागांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण 4 हजार 797.6 हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, यापैकी 4 हजार 730.96 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.