Single Women Empowerment Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Single Women Empowerment: अहिल्यानगर जिल्ह्यात १,००० एकल महिलांच्या सक्षमीकरणाचा इष्टांक

आर्थिक स्वावलंबनासाठी शासकीय विभाग, स्वयंसेवी व प्रशिक्षण संस्थांचा सहभाग आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

पुढारी वृत्तसेवा

नगर: आगामी वर्षात जिल्ह्यातील एक हजार एकल महिलांना आर्थिकदृट्या सक्षम करण्याचा इष्टांक निश्चित करण्यात आला असून, या कामात सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, प्रशिक्षण संस्था, औद्योगिक आस्थापना अशा सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केली.

जिल्हा एकल महिला सक्षमीकरण कार्यक्रम समितीची बैठक सोमवारी (दि. 16) जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी डॉ. आशिया बोलत होते. यावेळी कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका मंजुषा थवकर, उमेद चे जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, कौशल्य विकास अधिकारी शुभदा पाठक, माविमचे दीपक माने, बार्टीचे दिलावर सय्यद, महापालिकेच्या सुप्रिया घोगरे, जिल्हा उद्योग केंद्राचे हवालदार, महिला व बालकल्याण विभागाचे अमोल गोसावी, संजय कावरे, साऊ संस्थेचे मिलिंदकुमार साळवे, आरसेटीचे आर. जी. देशमुख, लीड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक आशिष नवले, देवेंद्र राऊत, स्वामिनी संस्थेच्या शीतल आंग्रे, सीवायडीएच्या आरती बेरड आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, जिल्ह्यातील नगरपालिका व महानगरपालिकेची निवडणूक आता पूर्ण झालेली आहे. त्यामुळे सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी नागरी भागातील एकल महिलांच्या सक्षमीकरण कार्यक्रमासाठी विशेष लक्ष देऊन पुढाकार घ्यावा. नुकत्याच झालेल्या साई ज्योती प्रदर्शनात 150 पेक्षा जास्त महिला बचतगट सहभागी झाले होते.

त्यामध्ये 21 गट हे एकल महिलांचे होते. या प्रदर्शनाच्या चार दिवसांत 2.75 कोटींची आर्थिक उलाढाल झाल्याचे उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांनी दिली. 2026-27 या वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या 1000 एकल महिला सक्षमीकरण इष्टांक पूर्तीसाठी विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था व प्रशिक्षण संस्था यांना स्वतंत्र इष्टांक देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

300 महिलांचा लवकरच पालकमंत्र्यांसोबत संवाद: देशमुख

कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख म्हणाले, राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या एकल महिला सक्षमीकरण कार्यक्रम राज्याला नवी दिशा देणारा आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात निश्चित केलेले जिल्ह्यातील 300 एकल महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट 26 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण झाले आहे. आता आगामी काळात 1000 महिलांना आर्थिकदृष्ट्‌‍या सक्षम करण्याचा इष्टांक निश्चित करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या 300 एकल महिलांचा लवकरच पालकमंत्र्यांसमवेत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT