नगर: गेल्या चौदा दिवसांत फक्त सरासरी फक्त २१.२ मिलिमीटर पाऊस झाला. कर्जत तालुक्यात सर्वाधिक ७४.५ मिलिमीटर नोंद झाली. अकोले व राहाता तालुक्यांत १ मिलिमीटरची नोंद आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात १८ जूनपर्यंत वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नागरिकांनी या कालावधीत सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सोमवारी ते गुरुवारपर्यंत काही भागांत विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ३० ते ४० किलोमीटर प्रतितास सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या चार दिवसांपैकी मंगळवारी व गुरुवारी ‘येलो अलर्ट’ राहण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
गेल्या चौदा दिवसांत जिल्हाभरात ५०.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना फक्त २१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरी फक्त ४२ टक्के पाऊस झाला आहे. कर्जत तालुक्यात मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यात आतापर्यंत ७४.५ तर जामखेड तालुक्यात ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नगर तालुक्यात सरासरी २०.५, पारनेरमध्ये १४.९, पाथर्डीत १८, नेवासा १९ तर श्रीरामपूर तालुक्यात १२.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीही ५२.४ मिलिमीटरची नोंद होती.