नगर: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वांत मोठी ‘पॉलिटिकल लॅब’ (राजकीय प्रयोगशाळा) म्हणून अहिल्यानगरच्या राजकारणाकडे पाहिले जात आहे. कारण, पक्ष किंवा निवडणूक कोणतीही असो, त्यात नगरचा विचार करावाच लागतो, हे दिसले आहे. यातूनच, जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असताना, विधान परिषदेतही अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आमदारांची संख्या 17 झाली आहे. आता 18 वा आमदार कोणत्या मतदारसंघातून आणि कोण येणार, याची उत्कंठा असली तरी धक्कातंत्र पाहायला मिळणार हे नक्की.
अहिल्यानगर जिल्हा हा क्षेत्रफळाने सर्वांत मोठा आहे. याशिवाय राजकीय ताकदही तितकीच मोठी असल्याचे दिसले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात निर्णय घेताना अहिल्यानगरच्या राजकारणाचाही तितकाच गांभीर्याने विचार करावा लागतो, असे बोलले जाते. गेल्या पाच वर्षांपासून विशेषतः महायुती सरकारने तर नगरमध्ये ‘राजकीय प्रयोगशाळा’ बनवली आहे. यात अनेकदा भाजपचे धक्कातंत्रही पाहायला मिळाले. त्यामुळेच, जिल्ह्यातील 12 पैकी चार विधानसभा मतदारसंघांत आज दोन-दोन आमदार काम करताना दिसत आहेत. याशिवाय याच काळात जिल्हा बँकेतही भाजपचे (स्व.) शिवाजीराव कर्डिले अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांना अध्यक्षपद बिनविरोध देणे, हाही प्रयोग असल्याचेच मानले जाते.
विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमध्ये प्रा. राम शिंदे यांचा पराभव झाला होता. मात्र योग्य वेळ येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. आज ते विधान परिषदेचे सभापती आहेत. आज कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार, प्रा. राम शिंदे आणि नुकतेच विधान परिषदेवर निवडले गेलेले सुनील कर्जतकर (जामखेड) असे तीन आमदार मिळाले आहेत.
संगमनेरात शिवसेनेचे अमोल खताळ आमदार आहेत. मात्र तेथील सत्यजित तांबे पदवीधर मतदारसंघातून विजयी होऊन विधान परिषदेत गेले. त्यासाठी भाजपने दिलेला अप्रत्यक्ष पाठिंबाही लपून राहिला नव्हता. त्यामुळे संग़मनेरात आज खताळ-आणि तांबे असे दोन आमदार आहेत. पाथर्डीत आमदार मोनिका राजळे आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातून मूळ पाथर्डीचे असलेले शिवाजीराव गर्जे यांना (स्व.) अजित पवार यांनी विधान परिषदेत पाठवले.
गर्जे यांना चार वेळा आमदारकीने हुलकावणी दिल्यानंतर पाचव्यांदा ही संधी दिली गेली. त्यामुळे आता पाथर्डीतूनही राजळे व गर्जे असे दोन आमदार आहेत. कोपरगावमध्ये काळे-कोल्हे हे पारंपरिक विरोधक असले, तरी विधानसभेला ही जागा महायुतीला गेली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांच्यासाठी विवेक कोल्हे यांना पक्षाने थांबवले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या 12 जागांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या कोट्यातून विवेक कोल्हे यांना आमदार म्हणून पक्षाने त्यागाचे फळ दिले. आज कोपरगावलाही काळे-कोल्हे असे दोन आमदार आहेत.