नगर : राज्याच्या राजकारणात सोयऱ्या धायऱ्यांचा ‘सोधा’ पॅटर्न दाखविऱ्या अहिल्यानगरने आता राजकीय सोयीचा नवीन ‘नगरी पॅटर्न’ देखील पुढे आणल्याची चर्चा आहे. अनेक कुटूंबात दोन राजकीय पक्ष तयार झाले आहेत. गेल्या दशकापासून हा पॅटर्न नगरच्या राजकारणात ‘सोयी’चा बनला आहे. (Latest Ahilyanagar News)
राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार हे राष्ट्रवादीचे दोन गट पुढे आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अकोलेच्या सुनीता अशोक भांगरे यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, त्याचवेळी मुलगा अमित भांगरे यांनी मविआच्या बैठकीला उपस्थिती राहत, ‘आईंचा तो व्यक्तीगत निर्णय’ असल्याचे सांगितले. त्यामुळे आज आई भाजपात आणि मुलगा राष्ट्रवादीत (शरद पवार) असल्याचे दिसते. मात्र, ही एकच घटना आहे, असेही नाही.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने तनपुरे घराण्याची उमेदवारी नाकारून स्व. शिवाजीराजे गाडे यांना पक्षाची उमेदवारी दिली होती. त्यावेळी डॉ. उषाताई तनपुरे, प्राजक्त तनपुरे यांनी शिवबंधन बांधत डॉ. तनपुरे यांना उमेदवारी मिळविली होती. मात्र, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी भावनिक नाळ जोडलेली राष्ट्रवादी सोडली नव्हती. त्यानंतर 2019 च्या नगर लोकसभा निवडणुकीवेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला जागा न सुटल्याने थेट भाजपात प्रवेश करत उमेदवारी केली होती. मात्र, त्याचवेळी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे तत्कालिन विरोधी पक्ष नेते होते. यावेळी त्यांनीही डॉ. सुजयचा हा व्यक्तीगत निर्णय असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे मुलगा एका पक्षात आणि वडील एका पक्षात, अशी राज्यात चर्चा झाली होती.
राज्यात काँग्रेसचे नेतृत्व करणारे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे तसेच विधानपरिषदेला काँग्रेसकडून दोन टर्म आमदार असलेले डॉ. सुधीर तांबे यांचे सुपूत्र डॉ. सत्यजित तांबे यांनी विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस सोडून अपक्ष निवडणूक लढवली. यावेळी भाजपनेही त्यांना अप्रत्यक्ष पाठींबा दिला होता. त्यावेळी वडील आणि मामा काँग्रेसमध्ये तर भाचे भाजप विचारधारेशी सुसंगत असल्याचे दिसले (पुढे ही भूमिका बदलल्याचे दिसते).
काही महिन्यांपूर्वी राहुरी कारखाना निवडणूक झाल्यानंतर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे लहान बंधू अरूण तनपुरे हे अजित पवारांसोबत गेले, तर माजी मंत्री प्राजक्त आणि प्रसाद तनपुरे यांनी शरद पवार गटातच राहणे पसंद केले. येेथेही दोन भाऊ अन काका, पुतण्या वेगवेगळ्या पक्षात दिसत आहेत.
तत्पूर्वी, अकोलेतून माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांचे वडील स्व. मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादी सोडलेली नव्हती. माजी मंत्री शंकरराव गडाख हे राष्ट्रवादी सोडून, शिवसेनेत गेले असताना, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी राष्ट्रवादीशी जिव्हाळा सोडला नव्हता.
एकूणच, राजकारणात बदलत्या स्थितंतरानुसार आजही घराघरांमध्ये पक्षाच्या विचारधाराही बदलताना दिसत आहे. अर्थात त्या फक्त जनतेला दाखवण्यापुरत्या असल्याचेही बोलले जाते.
जिल्ह्याच्या राजकारणात कर्डिले, थोरात आणि घुले यांची सोयऱ्या धायऱ्यांची मोठी लॉबी दिसली. स्व. शिवाजीराव कर्डिले हे भाजपात, त्यांचे व्याही स्व. अरूणकाका राष्ट्रवादीत, भानुदास कोतकर काँग्रेस, या सर्व नेत्यांनी आपापले पक्ष वाढवण्यासाठी काम केले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमध्ये असले, तरी भाचेजावई माजी मंत्री शंकरराव गडाख हे शिवसेनेत आहेत. पाथर्डीत भाचेसून आमदार मोनीका राजळे भाजपामध्ये आहेत. यातील गडाख-विख; साडूंचे नातेसंबंध पाहता थोरात-विखेही ‘पाहुणे’ आहेत. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे तळ्यात मळ्यात असताना, जावई आशुतोष काळे हे अजित पवारांसोबत आहेत. राहुरीचे साडू असलेले तनपुरे कुटूंब हे शरद पवारांसोबत आहे. व्याही शंकरराव गडाख हे शिवसेनेत आहेत, गडाखांचे पाहुणे, अर्थात घुलेंचेही पाहुणे झालेले राजळे भाजपात आहेत. एकूणच, राजकीय सोयरे देखील वेगवेगळ्या पक्षात आहेत. विधानपरिषदेसह सहकारातील निवडणुकीत ही लॉबी नेहमीच एकवटल्याचे दिसते.