नगर: जिल्ह्यात दोन दिवसांपासून सूर्य पुन्हा आग ओकू लागला आहे. सोमवारी (दि. 11) सकाळी आठ वाजल्यापासूनच चटके बसण्यास प्रारंभ झाला. जिल्ह्यात तापमानाचा कमाल पारा 42 अंश सेल्सिअसच्या आसपास होता.
उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याने नगर शहरातील रस्ते ओस पडले होते. वाढत्या उन्हामुळे नगरकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या आठवड्यात उन्हाचा तीव्रता वाढली होती.
तापमानाचा कमाल 42 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविला गेला होता. ही तापमान वाढ अशीच राहील, असे वाटप असताना मध्यंतरी उन्हाचा तीव्रता कमी झाली होती. सरासरी 38 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता.
मात्र, रविवारी पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली. दुसऱ्या दिवशी सोमवारी पुन्हा तापमानात कमाल वाढ झाली. दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा अधिक होता. त्यामुळे बहुतांश नागरिकांना बाहेर न पडता घरातच राहणे पसंत केले. कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्यांना टोपी, उपरणे आदीचा वापर करावा लागला.
मात्र, सर्वसामान्य जनतेच्या घरांतील फॅनदेखील गरम हवा सोडत असल्यामुळे आबालवृध्दांच्या अंगाची लाहीलाही झाली. उन्हाच्या तडाख्यात कासावीस झालेल्या जनतेने थंड पेयांचा आसरा घेतला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता होती. दुपारी ओस पडलेले रस्ते सायंकाळी सातनंतर मात्र, गर्दीने फुलून गेले. बाजारपेठांतदेखील नागरिकांची झुंबड उडाली होती. रात्री आठनंतर घरादारांत उकाडा जाणवत असल्यामुळे नागरिकांनी रात्री उशीरापर्यंत बाहेर फिरणे पसंत केले.