Tree Plantation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Green City Project 2026: अहिल्यानगरमध्ये ‘ग्रीन सिटी’ मोहिमेला गती; एक लाख झाडे लावण्याचा संकल्प

पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम; नागरिकांचा सहभाग आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

नगर: अहिल्यानगर शहराला हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या ‌‘नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी‌’ मोहिमेची तयारी आता वेगाने सुरू झाली असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने नियोजनाला गती दिली आहे. अहिल्यानगर महानगरपालिका आणि साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत शहरात एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी मनपाच्या उद्यान विभागाची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक आयुक्त यशवंत डांगे व उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीस उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, ग्रीन सिटी मोहीम समिती सदस्य कैलास दिघे, हर्षल आगळे, इंजिनिअर प्रताप काळे यांच्यासह उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त यशवंत डांगे यांनी उद्यान विभागाचा आढावा घेत शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपणासाठी योग्य जागांची निवड, झाडांच्या प्रजाती, संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना आणि दीर्घकालीन देखभालीबाबत विविध सूचना दिल्या. शहरातील उद्याने, रस्त्यांच्या दुतर्फा जागा, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

उपमहापौर ॲड. धनंजय जाधव म्हणाले, जागतिक पर्यावरण दिन आला की अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते; मात्र त्यानंतर त्या झाडांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होते. केवळ फोटोसेशनसाठी झाडे लावून उपयोग नाही, तर ती जगविणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‌‘ग्रीन सिटी‌’ ही केवळ मोहीम नसून शहराच्या भविष्यासाठी सुरू केलेली लोकचळवळ आहे. अहिल्यानगर शहर दिवसेंदिवस विकसित होत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे झाले आहे. वाढते प्रदूषण, तापमानवाढ व कमी होत चाललेली हरितक्षेत्रे ही चिंतेची बाब आहे.

त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी पुढे येणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सहभागाशिवाय ही मोहीम यशस्वी होऊ शकत नाही. शहरातील प्रत्येक प्रभाग, संस्था, सामाजिक संघटना, युवक आणि विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन हरित नगर घडविण्यासाठी योगदान द्यावे.‌ ‘ग्रीन सिटी‌’ उपक्रमामुळे शहराच्या पर्यावरणीय विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात विविध प्रकारची सावलीची, फळझाडे, औषधी वनस्पती आणि पर्यावरणपूरक वृक्ष मोठ्या प्रमाणात लावण्यात येणार असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार आहे, अशी माहिती उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी दिली.

अहिल्यानगरची राज्यात ओळख होणार: ॲड. जाधव

महापालिकेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे आदर्श काम उभे करायचे आहे. प्रत्येक लावलेले झाड जगले पाहिजे, यासाठी योग्य नियोजन, पाणीपुरवठा आणि नियमित देखभाल आवश्यक आहे. या मोहिमेमुळे महापालिकेचा नावलौकिक वाढेल आणि भविष्यात अहिल्यानगर शहर ‌‘ग्रीन सिटी‌’ म्हणून राज्यात ओळखले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT