नगर: राज्य सरकारच्या वतीने कर्जमुक्ती जाहीर झाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान झळकले आहे. पहिल्या यादीत 1 लाख 32 हजार 734 शेतकऱ्यांची नावे आली असून, यापैकी केवळ 22 हजार शेतकऱ्यांचे आधारप्रमाणीकरण झाले आहे. त्यामुळे उवर्रीत 1 लाख 10 हजार शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी आपले आधारप्रमाणीकरण करून घ्यावे लागणार आहे. दरम्यान, लवकरच उवर्रीत एक लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी येणार असून, त्याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेचे एकूण 2 लाख 33 हजार 711 शेतकरी हे दोन लाखापर्यंतच्या कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत. दोन दिवसांपूर्वी यापैकी 1 लाख 32 हजार 734 शेतकऱ्यांची पहिली यादी गावागावात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, यातील अनेक शेतकऱ्यांचे आधारप्रमाणीकरण बाकी असल्याने त्यांची आता गावच्या सेतू केंद्रांत गर्दी उसळलेली पहायला मिळत आहे.
दरम्यान, पहिल्या यादीत राष्ट्रीयकृत बँकांची 16 हजार 222 खाते असून, त्यांनाही आधारप्रमाणीकरण करून घ्यावे लागणार आहे. मात्र, कर्जदार आणि बँक व्यवस्थापनामध्ये समन्वयाचा अभाव जाणवत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी तसेच सहकार विभागापर्यंत पोहचत असल्याने, याकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पहिली यादी
तालुका लाभार्थी रक्कम
अकोले: 6190: 56.07
जामखेड: 6842: 65.74
कर्जत: 6556: 66.82
कोपरगाव: 2515: 24.14
नगर: 6598: 55.71
नेवासा: 16360: 162.88
पारनेर: 5741: 40.37
पाथर्डी: 5698: 43.56
राहाता: 3928: 31.25
राहुरी: 10900: 105.75
संगमनेर: 7168: 63.41
शेवगाव: 10867: 105.42
श्रीगोंदा: 21057: 225.02
श्रीरामपूर: 6092: 52.19
(रक्कम कोटीत)
साधारणतः 1 लाख 32 हजार शेतकऱ्यांच्या नावांची कर्जमुक्तीची पहिली यादी प्राप्त झाली. उवर्रीत नावेही टप्पाटप्प्याने येतीलच. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे. हे करताना शेतकऱ्यांनी सोबत जमिनीचे सातबारे ठेवावेत. ॲग्री स्टॅकची जर नोंदणी नसेल तर सर्वप्रथम ॲग्री स्टीकची नोंदणी लगेच करून घ्यावी व फार्मर आयडी काढून घ्यावा.मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक, सहकार