नगर: विधिमंडळ अंदाज समितीने तिसर्या दिवशीही पशुसंवर्धन, महापालिका तसेच बांधकाम विभाग तसेच विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेत अधिकार्यांना धारेवर धरले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना देत, समितीने जाता जाता जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण योजनांचे कौतूक केले. तिसर्या दिवशी दुपारीच समिती गेल्याने तणावाखाली असलेल्या अधिकार्यांनी नि:श्वास सोडला. मात्र, विधिमंडळ सचिवांपुढे साक्षीला बोलावले जाईल का अशी भीती अधिकार्यांत वाढली आहे.
महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीने आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांचा जिल्हा दौरा केला. या दौर्यादरम्यान, समितीच्या धुळे जिल्ह्यातील कामगिरीचे येथे सावट पसरले होते. त्यामुळे अधिकारी वर्ग तणावाखाली आला. अशा परिस्थितीतही समितीचे येथील शाही स्वागत आणि राजेशाही थाटाची जिल्हाभरात चर्चा झाली. दौर्याच्या पूर्वसंध्येला शासकीय विश्रामगृहात नियोजनाच्या नावाखाली अधिकार्यांकडे केलेल्या सुविधांची मागणी चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे अधिकार्यांचे टेन्शन अधिकच वाढले होते.
अंदाज समितीच्या दौर्यामुळे महसूलसह विविध विभागांचा बेजबाबदार कारभार उघडकीस आला. नागरिकांच्या तक्रारी आणि बैठकीत उघडकीस आलेली अनियमितता त्यामुळे समिती सदस्यांनी संबंधित अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरत त्यांना जबाबदारीचे आणि असलेल्या अधिकाराची आठवण करुन दिली. त्यामुळे समिती विधिमंडळ सचिवांपुढे साक्ष लावणार अशी समजूत करीत काही अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.
शनिवारी (दि.८) जाता जाता समितीने अवघ्या दोन तासांची बैठकीत पशुसंवर्धन, महापालिका आदींसह नगर-मनमाड महामार्गाच्या कामाचा, अकोल्यातील विविध लोककल्याणकारी योजनांचा तसेच इतर तालुक्यांतील घरकुलांच्या कामाचा आढावा घेत, जिल्हाभरातील विविध कामांचे कौतुक केले.
अहिल्यानगर जिल्हा दूध उत्पादनात आघाडीवर असल्याने समितीने पशुसंवर्धन विभागाच्या कार्याची विशेष प्रशंसा केली. जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, पशुपालकांसाठीच्या योजना तसेच दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची समितीने सविस्तर माहिती जाणून घेतली.
जाता जाता समाधान...
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या वृक्षलागवड मोहिमेचे, तसेच शिक्षण विभागातील विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचेही समितीने कौतुक केले. ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानात जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल समितीने अभिनंदन केले. महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचेदेखील कौतुक केले. समितीसमोर सादर केलेली माहिती व दिलेली माहितीपूर्ण उत्तरे तसेच समितीच्या जिल्हा दौऱ्याचे जिल्हा प्रशासनाने केलेले काटेकोर व यशस्वी नियोजन याबद्दलही समितीने समाधान व्यक्त केले.