नगर: आ. संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे हे स्वतः रोडवर उतरून शहरासाठी काम करत आहेत. त्यांच्याप्रमाणे आपणही सर्वजण शहरासाठी योगदान देऊन अहिल्यानगरचे नाव देशात नेऊ. जसा रस्त्यावरील कचऱ्याचे निर्मूलन करतो तसेच ई कचऱ्याचे निर्मूलन होणेही आवश्यक आहे. या मोहिमेसाठी विचार भारतीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. सर्व नगरसेवकांनी या अभियानात सहभगी होत अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन महापौर ज्योती गाडे यांनी केले आहे.
शहर विकासासाठी विचार भारती संस्थेतर्फे सुचवण्यात आलेल्या सहा मुद्यांची सुरुवात शहरात ई कचरा निर्मूलन मोहिमेने होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी गुरूवारी गुरुवारी मनपा सभागृहात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधाव, आयुक्त यशवंत डांगे, विचार भारतीचे मार्गदर्शक रवींद्र मुळे, उपायुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्यासह महायुतीचे नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे व एनजीओचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले, महानगरपालिकेमध्ये आता चांगल्या विचाराने काम करणाऱ्यांची सत्ता आली आहे. त्यामुळे भविष्यात शहरात चांगले विकास कामे करून दाखवू. विचार भारतीने सूचवलेल्या सहा संकल्पनांवर काम करून हे अभियान यशस्वी करू. महानगरपालिका कायम विचार भारतीय बरोबर राहणार आहे. त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहेत त्या निश्चितच आम्ही पूर्ण करू, असे सांगून ई कचरा निर्मूलन अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
रवींद्र मुळे म्हणाले, शहराचा वैभवशाली व ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत जावा व त्यांनी तो जपावा यासाठीच विचार भारती प्रयत्नशील आहे. हिवरे बाजार, राळेगण सिद्धी हे देशात आदर्श ठरली आहेत त्याप्रमाणे अहिल्यानगर शहर आदर्श व्हावे, यासाठी पुढील पाच वर्ष विचार भारती काम करणार आहे.
यावेळी झालेल्या प्रश्नोत्तर व चर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक संपत बारस्कर, भाजपाचे नगरसेवक निखील वारे, अविनाश घुले यांच्यासह हरजितसिंग वधवा यांनी विविध मुद्दे मांडून आयुक्त यशवंत डांगे व विचार भारतीच्या कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी केले. राजेंद्र तागड यांनी आभार मानले.
नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे: आयुक्त डांगे
विचार भारती प्रेरणादायी विचारांचा जागर करत चांगल्या संकल्पना सूचवत आहे. त्यामुळे विचार भारती बरोबर काम करून ई कचरा निर्मूलन अभियान महानगरपालिकेमार्फत राबवले जाणार आहे. येत्या 23 फेब्रुवारी रोजी शहरात प्रत्येक प्रभागात तसेच विविध ठिकाणी सेंटर उभारून सकळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे अभियान राबवले जाणार आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरातील जुने बंद पडलेले व अडगळीतील वापरात न येणारे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे निर्मूलन होण्यासाठी या अभियानात सहभगी होत सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.