नगर: मुळा, भंडारदरा व निळवंडे आदी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाचा म्हणावा असा जोर नाही. साहजिकच धरणांत नवीन आवक नगण्य अशी आहे. त्यामुळे धरणांनीदेखील तळ गाठलेला असून, आजमितीस जिल्ह्यातील धरणांत २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात पाणलोटात मुबलक पाऊस झाल्याने मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही धरणांचा पाणीसाठा सरासरी ४८ टक्क्यांवर होता. यंदा पावसाने अशीच ओढ दिल्यास जिल्हा दुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता वाढली आहे.
यंदा ‘अल निलो’चा प्रभाव असल्याने यंदा पावसाचे प्रमाण कमी असणार असल्याची चर्चा होत आहे. जून महिना संपत आला तरीही अद्याप जिल्हाभरात मुसळधार पावसाची नोंद नाही. पेरणीसाठी ओलावा धरणारा पाऊस झाला नसल्याने जवळपास पावणेसहा लाख हेक्टर क्षेत्र पेरणीअभावी पडून आहे. अशीच परिस्थिती धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिसून येत आहे.
गेल्या वर्षी मात्र, पाणलोट क्षेत्रात मुसळधार आणि सततचा पाऊस सुरु होता. त्यामुळे भंडारदरा, मुळा, भंडारदरा आदी मोठी धरणे जून महिन्यामध्ये ५० टक्क्यांच्या आसपास भरली गेली होती. आढळा धरण तर ८७ टक्के भरले होते. गेल्या मे महिन्यात दक्षिण जिल्ह््यात पाऊसच पाऊस झाल्याने जून महिन्यामध्येच सीना धरण ओव्हर फ्लो झाले होते. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांत २६ हजार ३४५ दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध होता.
यंदा मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम सुरु आहे. त्यामुळे नवीन पाण्याची म्हणावी अशी आवक अद्याप सुरु नाही. १ जूनच्या दरम्यान जिल्हाभरातील धरणांत १५ टीएमसीच्या आसपास पाणीसाठा शिल्लक होता. मात्र मध्यंतरी सिंचन आणि बिगरसिंचनासाठी साडेतीन टीएमसीच्या आसपास आवर्तन सोडण्यात आले होते. त्यामुळे आजमितीस २८ जून २०२६ रोजी धरणांत फक्त ११ हजार ८८८ दलघफू (पावणेबारा टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ हजार ४५८ दलघफू( साडेचौदा टीएमसी) पाणीसाठा कमी आहे.
तुटीच्या पावसामुळे खरीप पेरणी रखडली असून, पाणलोटात म्हणावा असा जोर नसल्यामुळे धरणे खपाटीला गेली आहेत. आगामी काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
पाणलोटातील पाऊस
(यंदाचा आणि गेल्या वर्षीचा)
रतनवाडी १५४ (११६९), घाटघर १७० (११५९), पांजरे १०६ (७३२), वावी ६७ (४८४), कोतूळ २० (१९४), भंडारदरा : ७५ (७०६), निळवंडे ३६(३४१), मुळा ८१ (१७८), मांडओहळ २५ (५८), घाटशीळ ८३ (३९). (मिलिमीटर)
भातकुडगाव, ढोरजळगाव मंडळांत अतिवृष्टी
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत रविवारी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. सरासरी १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक ३७ मिलिमीटर तर शेवगाव, श्रीगोंदा, नगर, पाथर्डी, कोपरगाव आदी तालुक्यांतही मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव व ढोरजळगाव या दोन महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसाने खरीपपेरणीस वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ‘येलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. रविवारी (दि.२८) सकाळी १० ते सोमवार (दि.२९ )सकाळी १० वाजेपर्यंत या २४ तासांत सरासरी १५ मिलिमीटर पाऊस झाला. नगर शहर आणि परिसरात पावसाने दुपारी हजेरी लावली. त्यानंतर रात्रीही सततधार सुरुच होती. तालुक्यातही चांगलाच पाऊस झाला. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक तर जामखेड तालुक्यात सर्वॉत कमी २.२ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात कुठेना कुठे रिमझिम सुरुच होती. रविवारी झालेल्या पावसाने शेतात ओल निर्माण होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे पेरणीला वेग येण्याची शक्यता वाढली आहे.
जिल्ह्यातील जवळपास ११८ महसूल मंडलांत पावसाने हजेरी लावली शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव मंडलात ७९.५ व ढोरजळगाव मंडलात ७९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय नालेगाव मंडलात ४९.३, सुपा मंडलात ४६.३, मांडवगण मंडलात ४७.३, पाथर्डी ४१.८, माणिकदौंडीत ४१.८, कारेगाव ३६, टाकळीभान ३६, रुंभोडी ३७.५, अकोले ३७.५, धांदरफळ ३७.५, नेवासा बुद्रुक ३६.५, भांबोरा २८, देवदैठण ३३.५, पोहेगाव महसूल मंडलात २७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान, जिल्ह्यातील ३ जुलैपर्यंत वादळी वार्यासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे ‘येलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला असून, जनतेने दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
रविवारचा पाऊस
नगर १९.२, पारनेर १२.९, श्रीगोंदा १९.४, कर्जत ११.१, जामखेड २.२, शेवगाव २६.३, पाथर्डी १६.२, नेवासा १३.८, राहुरी ११.२, संगमनेर१२.६, अकोले ११.६, कोपरगाव १४.९, श्रीरामपूर ३७, राहाता ११.४. (मिलिमीटर)