नगर: महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात एकूण 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे.
रविवारी (दि.3) जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत नगर शहरात 3, अकोल्यात 1, राहुरीत 1, श्रीगोंद्यात 1, पाथर्डीत 1, नेवाशात 1 आणि नगर तालुक्यात 1 असे एकूण 9 बालविवाह थांबविण्यात आले.
या मोहिमेत पोलिस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाइन कक्ष यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनीही अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.