नगर: राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजना’मध्ये जिल्हा बँकेचे थकीत कर्ज असलेले जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार २८२ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. संबंधित शेतकरी खातेदारांचा तपशील शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे तसेच शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजना' जाहीर केली आहे.
सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने योजनेची पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी होऊन पात्र शेतकऱ्यांना तातडीने लाभ मिळावा, यासाठी बँकेला खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, दि. २८ जून २०२६ अखेर बँकेने ९९.८४ टक्के पात्र कर्जदार खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
२०१९ ची अट रद्द होणार का?
यंदाच्या कर्जमाफीत ज्या शेतकऱ्यांना 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, त्यांना यावेळी 50 हजारापर्यंतच कर्जमाफी दिली जाणार आहे. उवर्रीत रक्कम त्यांना भरावीच लागणार आहे. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. अनेक ठिकाणी आंदोलनेही सुरू आहेत. त्यामुळे या अधिवेशनात ही अट रद्द झाल्यास शेतकऱ्यांना खऱ्याअर्थाने कर्जमाफीचा लाभ होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
312 खाती अपलोड करणे बाकी
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पात्र शेतकऱ्यांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत असून, उर्वरित 312 खात्यांची माहितीही लवकरच अपलोड करण्यात येणार आहे.
यात नेवाशाचे सर्वाधिक 128 शेतकरी आहेत. यापैकी 16 खातेदार मयत आहेत, 20 खातेदारांचे आधारकार्ड नाही, 109 शेतकऱ्यांकडे 1000 रुपयांपेक्षा कमी कर्ज आहे. 18 खात्यांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, तर इतरही 149 खाती तांत्रिक कारणाने अपलोड करणे बाकी आहे.