नगर: महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना अधिक गती व सुसूत्रता मिळावी तसेच त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्ह्यात 15 कोटी रुपये खर्चाचे ‘महिला व बाल विकास भवन’ (अहिल्याभवन ) उभारणीस मान्यता मिळाली. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन वर्षांत अहिल्याभवन इमारत उभी राहाणार आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली. एकाच छताखाली तब्बल 13 विभागांची कार्यालये आणि सुमारे 110 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
महिला व बालविकास विभागांतर्गत विविध योजना जिल्ह्यात स्वतंत्रपणे कार्यरत असून, लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जावे लागत होते. या प्रक्रियेमुळे वेळ, श्रम आणि संसाधनांचा अपव्यय होत होता. या पार्श्वभूमीवर सर्व सेवा ‘एकाच छताखाली’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या भवनासाठी 15 कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 8 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, पुढील दोन वर्षांत या भवनाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे भवन महिला सक्षमीकरणासाठी एक सक्षम व्यासपीठ ठरणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी म्हटले.
या कार्यालयांचा असणार समावेश
अहिल्याभवनात राज्य शासनाचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष , महिला आर्थिक विकास महामंडळ, राज्य महिला आयोग, बाल विकास प्रकल्प कार्यालये, चाईल्ड हेल्पलाईन, बाल न्याय मंडळ, महिला सक्षमीकरण केंद्र आदी विविध विभागांची कार्यालये कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने मिळणार आहे.