Vote Pudhari
मुंबई

Election Ink: शाई पुसली जाण्याच्या वादानंतर निर्णय; झेडपी निवडणुकीत काडीनेच बोटाला शाई

5 फेब्रुवारीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत मार्कर पेनला फाटा; निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महानगरपालिकांच्या निवडणुकीत बोटावर लावलेली मार्कर पेनची शाई पुसली जाते, या विरोधकांच्या आरोपाची दखल घेत, 5 फेब्रुवारीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत मार्कर पेनऐवजी काडीने शाई लावण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे, अशी माहिती आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर, बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप मतदार आणि राजकीय नेत्यांनी केला असता, वाघमारे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आयोगाच्या निर्णयाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, राज्य निवडणूक आयोग 2011 पासून निवडणुकीकरीता मार्कर पेन वापरत आहे. बोटावर लावलेली शाई सुकण्यासाठी दहा ते बारा सेकंद लागतात. एवढा वेळ मतदार हा मतदान केंद्रातच असतो. त्यामुळे शाई पुसली जाण्याची कोणतीही शक्यता नाही. एकदा ही शाई वाळल्यानंतर ती कोणत्याही प्रकारे काढता येत नाही. भारतीय निवडणूक आयोगसुद्धा हीच शाई वापरत आहे.

शाई पुसली जात असल्याविषयी संभ्रम पसरवणे चुकीचे आहे. याशिवाय लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतही अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. आम्ही पूर्वीपासूनच कोरस कंपनीचे मार्कर पेन वापरत आहोत. त्यामुळे शाई पुसली जात असल्याचे आरोप चुकीचे आहेत. आमच्या कार्यालयातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान केले. त्यापैकी कुणाचीही शाई पुसली गेली नाही.

मुंबईसह सर्वच ठिकाणी दुबार मतदारांची ओळख पटल्याशिवाय मतदान करू दिले जात नाही. दुबार मतदारांकडे दोन ओळखपत्रे मागितली जातात. याशिवाय मतदान कक्षात मतदान प्रतिनिधीही असतात. ते उमेदवारांचे प्रतिनिधित्व करतात. तसंबंधित प्रभागातीलच ते असतात. त्यामुळे शाई पुसून पुन्हा एखादा मतदार आल्यास त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल. तसेच या प्रकरणी आयोगही चौकशी करेल.

निवडणूक आयोग पूर्णतः तटस्थ आहे. सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. आयोग कोणालाही झुकते माप देत नाही. या प्रकरणी मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे. फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे. सर्व गोष्टी आयोगावर ढकलल्या जात आहेत. खरे तर मतदार याद्यांमधील आपले नाव शोधण्याची जबाबदारी मतदारांचीही असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.

चौकशी करून रविंद्र चव्हाण यांच्यावर कारवाई करू

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वतःच्या खिशावर पक्षाचे निवडणूक चिन्ह लावून कल्याण-डोंबिवलीत मतदान केले. यावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी चव्हाण यांच्यावर निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल राऊत केला होता. त्यावर वाघमारे म्हणाले, या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. निवडणूक आयोग नियमांनुसारच काम करतो. कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT