मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड तसेच कोकण किनारपट्टीला आज (रविवार) पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे.
आयएमडीच्या फोरकास्टनुसार, शनिवारी कोकण किनारपट्टीसह रायगडला रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता. मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट होता. रेड अलर्टनुसार, कोकणात मुसळधार पाऊस पडला. रायगडमध्येही पावसाची धुमशान सुरू आहे. मात्र, यलो अलर्ट असूनही मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही पावसाच्या दमदार सरी बरसल्या. रविवारपासून पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे यलो अलर्ट असूनही मुंबई आणि पालघरमध्ये सरींवर सरी बरसू शकतात.
तापमानाचा अंदाज घेतल्यास, शनिवारी किमान २४ आणि कमाल २८ अंश सेल्सिअस तापमान होते. रविवारी त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे. सोमवारी (२९ अंश सेल्सिअस) कमाल तापमानात एकाने वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून, कमाल तापमानात घट अपेक्षित आहे.