Weather Forecast Pudhari News Network
मुंबई

Weather Forecast: हवामान अंदाज वर्तवणे दिवसेंदिवस आव्हानात्मक; IMD महासंचालकांनी स्पष्ट कबुली का दिली?

‘आयएमडी’चे महासंचालक महापात्रा; हवामान बदलाचा फटका

पुढारी वृत्तसेवा

Forecasting India's weather is becoming increasingly challenging due to climate change.

मुंबई : हवामान बदलामुळे भारताच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चालले आहे, अशी स्पष्ट कबुली भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे. एका विशेष मुलाखतीत त्यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर अचानक येणार्‍या तीव्र हवामानाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने, पारंपरिक हवामान पद्धतींची अचूकता कमी होत आहे आणि पूर्वीइतक्या सहजतेने वेळेपूर्वी अंदाज देणे कठीण झाले आहे.

आपत्कालीन व्यवस्थाही प्रभावित

डॉ. महापात्रा यांचे हे विधान हवामान बदलाच्या गंभीर परिणामांवर शिक्कामोर्तब करते. केवळ तापमानवाढ किंवा समुद्राची पातळी वाढणे इतकाच हा बदल मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर आणि देशाच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्रणालीवर होत असल्याचे यातून स्पष्ट होते.

वातावरणातील अतिरिक्त आर्द्रता

जागतिक तापमानवाढीमुळे वातावरण जास्त बाष्प धरून ठेवत आहे, ज्यामुळे कमी वेळेत प्रचंड पाऊस पडतो. समुद्राच्या आणि जमिनीच्या तापमानातील बदलांमुळे पारंपरिक हवामान प्रणाली अधिक तीव्र आणि अप्रत्याशित बनत आहेत.

मुख्य आव्हान काय?

डॉ. महापात्रा यांनी हवामान अंदाजापुढील नेमक्या आव्हानांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, आता स्थानिक पातळीवर अचानक ढगफुटी, काही तासांत होणारी अतिवृष्टी, गारपीट किंवा उष्णतेची तीव्र लाट यांसारख्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

हवामान विभागाची सज्जता

या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय हवामान विभागदेखील आपली क्षमता वाढवत असल्याचे डॉ. महापात्रा यांनी नमूद केले. ते म्हणाले, आम्ही केवळ पारंपरिक अंदाजांवर अवलंबून नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.

आयएमडीकडून वापरले जाणारे तंत्रज्ञान

  • डॉप्लर रडारचे जाळे : देशभरात डॉप्लर रडारचे जाळे विस्तारले जात आहे, ज्यामुळे प्रत्येक तासाला स्थानिक पातळीवरील हवामानाची अचूक माहिती मिळते.

  • सुपरकॉम्प्युटर : ’मिहीर’ आणि ’प्रत्युष’ यांसारख्या शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरमुळे हवामान मॉडेल अधिक वेगाने आणि अचूकपणे चालवता येतात.

  • उपग्रह निरीक्षण : प्रगत उपग्रहांमुळे ढगांची रचना, वार्‍याचा वेग आणि आर्द्रतेचे प्रमाण यावर 24 तास लक्ष ठेवणे शक्य झाले आहे.

  • ’नाऊकास्टिंग’ : या तंत्रज्ञानामुळे पुढील 2 ते 3 तासांसाठी अतिवृष्टी किंवा वादळाचा अत्यंत अचूक इशारा देणे शक्य झाले आहे, ज्यामुळे जीवित आणि वित्तहानी टाळता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT