मुंबई

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर आम्ही समाधानी : देवेंद्र फडणवीस

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवर आम्ही समाधानी आहोत. यावर आता घटनापीठासमोर सुनावणी होणं गरजेचं आहे. आम्ही कायद्याचे पालन केले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२०) दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, तुर्तास कुणालाही अपात्र करता येणार नाही. पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे अपात्रतेच्या नोटीसीवर परिस्थिती जैसे थे आहे. आमची केस मजबूत असून न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. काही जण चुकीची माहिती देत आहेत, त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.

दरम्यान, महाराष्‍ट्रातील सत्ता बदलासंदर्भातील याचिकांवर काही घटनात्‍मक मुद्‍यांवर निर्णय आवश्‍यक आहे. दोन्‍ही बाजूंनी २९ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे स्‍पष्‍ट करत याप्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्‍ट रोजी होईल, असे आज सरन्‍यायाधीश रमण्‍णा यांच्‍या अध्‍यक्षतेखालील खंडपीठाने  स्‍पष्‍ट केले. यामुळे आता राज्‍यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्‍च न्‍यायालयात पुढील सुनावणी  १ ऑगस्‍टला होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप – शिंदे गटाचे सरकार सत्तेवर आले. मात्र, हे सरकार बेकायदेशीर असून शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्याची याचिका शिवसेनेने दाखल केली होती. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयावर शिवसेनेच्‍या पुढील भवितव्‍याचा निर्णय होणार होता. यामुळे या निर्णयाकडे राज्‍यासह देशाचे लक्ष वेधले होते. सरन्‍यायाधीश रमण्‍णा यांच्‍या अध्‍यक्षतेखालील तीन सदस्‍यीय खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT