Uddhav Thackeray
मुंबई : निवडणूक आयोग आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण ‘शिवसेना’ हे नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. त्या धोंड्यानं ते बेकायदेशीर केलंय. ‘शिवसेना’ हे नाव दुसऱ्याला देता येत नाही. ते त्याच्या अधिकाराच्या बाहेरचं आहे, पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसल्याने सध्या चालून जातंय, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केली.
"लोक कोणत्याही धोंड्याचं ऐकणार नाहीत. शेवटी चोरीचा माल आहे. चोरून मतं मिळवलीत आणि त्यावर मर्दुमकी गाजवत असलात तरी चोर तो चोरच," अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका केली.
मतदान मतपत्रिकेवर व्हायला पाहिजे. मुळात ईव्हीएम का आणलं? मतमोजणीचा वेळ वाचवायला. मग एकेक महिना निवडणूक प्रक्रिया चालते, तो वेळ का धरत नाही? महाराष्ट्रात १ मे रोजी मतदान झालं आणि बिहारमध्ये ३० मे रोजी होत असेल तर मधला वेळ गेलाच ना? चार दिवस मतमोजणीला जास्त लागले तर असं काय आभाळ कोसळतं? अमेरिका, युरोपमध्येही बॅलेट पेपरवर मतदान होतं. ते देश आपल्यापेक्षा मागास आहेत का? स्वतः मोदींचंही ईव्हीएमच्या विरोधात भाषण आहे. भाजपवाल्यांनी एकदा ती ऐकावीत, असा सल्ला ठाकरे यांनी दिला.
राऊत यांनी ठाकरेंना पैशांच्या पावसात लोक वाहून गेले असं वाटत नाही का? असे विचारले. यावर ते म्हणाले, पैशांचा पाऊस तर पडलाच आणि त्यात बरेच लोक वाहून गेले हे आजही मान्य केलं जातं, पण आपल्याकडून जी काही उणीव राहिली ती आपण मान्य केली पाहिजे. ती म्हणजे आपण केलेली कामं सांगू शकलो नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शिवभोजन, शेतकऱ्यांना हमीभाव, लॉ अँड ऑर्डर व्यवस्थित होती. बरंच काही केलं. कोरोनाच्या संकटात मी मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांना समानतेनं वागवलं. सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. आवश्यक वाटेल तेव्हा जबाबदारी घेऊन ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून लोकांसमोर गेलो. जनतेनं मला त्यांच्या कुटुंबातला एक मानलं. ज्यांना कधी भेटलो नाही ते मला त्यांच्या कुटुंबातला मानतात यापेक्षा दुसरं भाग्य ते कोणतं? असही ठाकरे म्हणाले.