मुंबई/ खेड: आनंदाचे क्षण काही क्षणांतच दुःखाच्या महासागरात बदलू शकतात, याची प्रचिती रत्नागिरीतील खेड शहरालगतच्या जगबुडी नदीपात्रात बुधवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेतून आली. चेंबूर येथून नातेवाईकांकडे सुट्टीसाठी गेलेल्या मुळच्या सांगलीतील तीन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू झाला. एका क्षणात तीन लेकरांचे आयुष्य संपल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आकाश रामा कांबळे (२३), नरेश रामा कांबळे (२२) आणि कैलास रामा कांबळे (१७) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे चेंबूर येथील मुकुंदनगर परिसरातील आहेत. खेड शहरातील एकविरानगर येथे राहणारे त्यांचे काका अनिल दगडू कांबळे आणि काकू पूजा कांबळे यांच्याकडे सुट्टीसाठी आले होते. सुट्टीतील आनंदाचे काही दिवस नातेवाईकांसोबत घालवण्यासाठी आलेल्या या तरुणांना मृत्यू इतक्या जवळ दबा धरून बसला आहे, याची कल्पनाही नव्हती.
बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आकाश, नरेश, कैलास आणि त्यांच्यासोबत असलेले गोपाळ राया कांबळे हे महाडनाक्याजवळील जगबुडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. पोहण्याचा आनंद लुटत असताना नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास तिघांपैकी एकजण पाण्यात बुडू लागला.
आपला भाऊ बुडत असल्याने त्याला वाचवण्यासाठी इतर दोघे त्याच्या मदतीला धावले, परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. एका जीवाला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही खोल पाण्यात अडकले आणि काही क्षणांतच जगबुडीच्या पाण्याने त्यांना कायमचे कवेत घेतले. यावेळी त्यांच्यासोबत गेलेले त्यांचे काका अनिल कांबळे व मोठे बंधू गोपाळ कांबळे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांसह बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली. अखेर तिघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. मृतदेह पाहून नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला चिरणारा होता. शवविच्छेदनासाठी तिन्ही मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात हलविण्यात आले.