पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला गेल इंडिया या पेट्रोकेमिकल्स कंपनीचा प्रकल्पही महाराष्ट्र सोडून गेल्याचे वृत्त आहे. छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे गेल इंडिया हा प्रकल्प उभारणार होती. या गुंतवणुकीच्या माध्यमातून इथेन क्रॅकिंग युनिट उभारले जाणार होते. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे.
ही माहिती मिळताच विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रातील गुंतवणूक पळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रावर बेगडी प्रेम दाखवत आहेत. राज्यातील तरुणांच्या हाताला मिळणारा रोजगार हिसकावून दुसऱ्याच्या घशात घालण्याचे पाप भाजप करत आहे, अशी टीका दानवे यांनी केली. केंद्र सरकारच्या दबावामुळे महाराष्ट्रात येऊ घातलेली गुंतवणूक परराज्यात जात असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला? महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला? याचे उत्तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी द्यावे, अशी मागणी दानवे यांनी केली.
हेही वाचा :