दीपक घोसाळकर : कळंबोली
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी (दि.17) प्रथमच सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास विमानाचे लॅन्डींग आणि त्यानंतर टेकऑफ करण्यात आले. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे छोटे विमान विमानतळाच्या धावपट्टीवरून प्रथमच उतरवण्यात आले. त्यानंतर त्याच विमानाने उड्डाण करुन पनवेल नगरीवरून प्रथमच अगदी कमी उंचीवरुन गेलेल्या या छोट्या विमानामुळे नागरिकांमध्ये प्रचंड औत्सूक्य निर्माण झाले आहे. हे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चाचणी घेण्यासाठी आणण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर निश्चितच लवकरच विमानतळ सुरू होणार असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा संपूर्ण देशात चर्चेमध्ये असणारा विषय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पायलट प्रोजक्ट असून या विमानतळाकडे पंतप्रधान कार्यालयाचे विशेष लक्ष आहे. 31 मार्च 2025 पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्याचा मानस केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचा आहे. यासाठी विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सद्यस्थितीत विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू असून विमानतळाच्या आजूबाजूच्या संरक्षक भिंतीचेही काम बहुतांशी पूर्ण झालेले दिसून येत आहे. तसेच विमानतळ व्यवस्थापन, नियंत्रण केंद्र आणि अन्य इमारतींचेही काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येते.
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानांने या धावपट्टीवरून लॅन्डींग आणि टेकऑफ केले. तसेच पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरावर घिरट्या घातल्या. हे विमान पनवेल शहराच्या अगदी 100 ते 150 फूट उंची वरून गेल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला. कालांतराने हे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सिग्नल यंत्रणा चाचणीसाठी प्रायोगिक तत्त्वावर आणण्यात आल्याचे पनवेलकरांच्या लक्षात आले. त्यामुळे विमानतळाबाबत पनवेलकर तसेच नवी मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान विमानतळाचे काम करणार्या सिडकोला आजच्या या विमान चाचणी बाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. अशी माहिती सिडकोच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे.