मुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेच्या सुधारित संरेखनास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मेट्रो ५ मार्गिकेचा पहिला टप्पा कापूरबावडी ते धामणकरनाका असा असून याचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार आणि ५ अ मार्गिका यांच्या सविस्तर आराखड्याला राज्य शासनाची यापूर्वीच मान्यता मिळाली आहे.
शासन निर्णयानुसार मेट्रो ५ मार्गिका एकूण ३४.२०५ किमीची असेल. कापूरबावडी ते धामणकर नाका असा ११.९ किमीचा पहिला टप्पा आहे. तेथून पुढे दुर्गाडी चौकपर्यंत १०.४७५ किमीचा दुसरा टप्पा असेल.
त्याचवेळेस दुर्गाडी-आधारवाडी-खडकपाडा-कल्याण असा तिसरा टप्पा असेल. कल्याणच्या भोईरवाडी येथून ५ अ मार्गिका सुरू होऊन ती उल्हासनगरपर्यंत जाईल. तिसरा टप्पा अधिक ५ अ मार्गिका यांची एकूण लांबी ११.८३ किमी असेल.
जुन्या आरेखनानुसार मूळ मार्गिकेचा खर्च ८ हजार ४१६ कोटी रुपये होता. नव्या आरेखनानुसार संपूर्ण मार्गिकेचा खर्च १८,१३०.५५ कोटी रुपयांवर गेला आहे. मेट्रो ५ आणि ५ अ च्या सविस्तर प्रकल्प आराखड्यास आता केंद्र शासनाचीही मान्यता मिळाली आहे.