Shivsena UBT Crisis  Pudhari
मुंबई

Shivsena UBT Crisis : खासगी विमानाने दिल्लीत, नोएडात मुक्काम; ठाकरेंच्या बंडखोर खासदारांची Inside Story

सहा खासदारांना तात्काळ '१+' दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे राज्‍य सरकारचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Shivsena UBT Crisis :

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडाचा झेंडा हात घेतल्‍याने मागील दोन दिवस महाराष्‍ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. अत्यंत गुप्तपणे राबवण्यात आलेल्या या 'ऑपरेशन'मुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात २०२२ नंतर पुन्हा मोठघ भूकंप झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बंडाची पटकथा गेल्या काही दिवसांपासून लिहिली जात होती. त्याचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेवूया....

१६ जून २०२६ : खासगी विमानाने दिल्लीत एन्ट्री!

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, १६ जून रोजी ठाकरे गटाचे ६ बंडखोर खासदार वेगवेगळ्या शहरांतून अत्यंत गोपनीयतेने खासगी विमानाने दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत आल्यानंतर माध्यमांची नजर टाळण्यासाठी या सर्व खासदारांची रवानगी थेट उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आली. तिथेच पुढील रणनीतीवर अंतिम शिक्कामोर्तब झाले.

१७ जून: रात्रीच घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट

१७ जून रोजी रात्री या ६ बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत खासदारांनी आपण एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन होत असल्याचा अधिकृत निर्णय अध्यक्षांना कळवला. तसेच, आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील आपली आसनव्यवस्थाही शिंदे गटाच्या खासदारांसोबत करण्यात यावी, अशी विनंतीही संबंधित खासदारांनी लोकसभा अध्‍यक्षांकडे केली आहे.

२० जून होणार एकनाथ शिंदेंसोबत बैठक; मोठी घोषणा होणार?

या राजकीय भूकंपाचा दुसरा अंक आगामी २० जून रोजी पाहायला मिळेल, असे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २० जून रोजी या बंडखोर खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लोकसभा अध्यक्षांसोबत झालेल्या चर्चेचा संपूर्ण तपशील आणि तसेच ठाकरे गट सोडण्यामागची नेमकी भूमिका स्पष्ट करणारे पत्र जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

६ खासदारांना तात्काळ '१+' दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेश

राज्य गुप्तवार्ता विभागाने (SID) एका अत्यंत तातडीच्या (CRASH) वायरलेस मेसेजद्वारे या सर्व ६ खासदारांना तात्काळ '१+' दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व खासदारांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात यावी, असा अधिकृत संदेश सर्व पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठविण्‍यात आला आहे.

गुप्तवार्ता विभागाचा तातडीचा 'वायरलेस मेसेज'

राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांच्या स्वाक्षरीने १७ जून २०२६ रोजी हा तातडीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, संजय देशमुख (खासदार - यवतमाळ), संजय जाधव (खासदार - परभणी), संजय दिना पाटील (खासदार - ईशान्य मुंबई), नागेश पाटील आष्टीकर (खासदार - हिंगोली, रा. नांदेड), ओमराजे निंबाळकर (खासदार - धाराशिव), भाऊसाहेब वाघचौरे (खासदार - शिर्डी) यांना तातडीने सुरक्षा व्यवस्था पुरवावी. तसेच, ४ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार आगामी जिल्हास्तरीय किंवा आयुक्तालय पातळीवरील समितीच्या बैठकांमध्ये या सुरक्षेचा आढावा घेऊन ती वाढवणे, कमी करणे किंवा कायम ठेवण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असे नमूद करण्‍यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT