मुंबई: मतदार यादीतील त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र नागरिकाची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या फॉर्मवर शिक्षकांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक छापण्यात आल्याने राज्यातील शिक्षकांना दिवसभर फोन कॉल्सचा भडिमार सहन करावा लागत आहे.
यामुळे शिक्षकांच्या गोपनीयतेचा भंग होत असून, विशेषतः महिला शिक्षकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
एसआयआरच्या कामावर नियुक्त शिक्षकांना पहाटे ६ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत मतदार, राजकीय कार्यकर्ते आणि इतरांकडून सातत्याने फोन येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
मतदार नोंदणी, फॉर्म भरणे आणि नाव पडताळणीसंदर्भातील चौकशीबरोबरच अनेक अनावश्यक फोनही येत असल्याने अध्यापन आणि निवडणुकीची जबाबदारी यांचा ताळमेळ साधणे कठीण होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
महिला शिक्षकांना रात्री उशिरापर्यंत अपरिचित व्यक्तींचे फोन येत असल्याने त्यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर एसआयआर प्रक्रियेच्या फॉर्मवरील वैयक्तिक मोबाईल क्रमांक तातडीने हटवून स्वतंत्र हेल्पलाइन आणि कॉल सेंटर सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र शिक्षक सेनेने केली आहे.
याबाबत महाराष्ट्र शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर देवराम सरोदे यांनी सांगितले की, अध्यापनासोबत एसआयआरची जबाबदारी पार पाडताना शिक्षकांवर आधीच मोठा ताण आहे.
त्यात कोणतीही संमती न घेता वैयक्तिक मोबाईल क्रमांक फॉर्मवर छापण्यात आल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. वर्गात अध्यापन सुरू असताना प्रत्येक फोनला प्रतिसाद देणे शक्य होत नाही. मात्र, फोन न उचलल्यास संबंधितांकडून अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या जात असून त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त दबाव निर्माण होत आहे.
स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करा!
एसआयआर प्रक्रियेसाठी स्वतंत्र हेल्पलाइन, कॉल सेंटर, डेटा सहाय्यक आणि हेल्पडेस्क ऑपरेटर नियुक्त करावी. तसेच एसआयआरची जबाबदारी शिक्षकांऐवजी सुशिक्षित बेरोजगार युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा प्रशिक्षित स्वयंसेवकांकडे सोपवावी, जेणेकरून शिक्षकांना त्यांच्या मूलभूत अध्यापनाच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल, अशी भूमिकाही महाराष्ट्र शिक्षक सेनेने मांडली आहे.