मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रामुळे सुनेत्रा यांच्यासह पार्थ पवारसुद्धा अडचणीत येत असल्यामुळे हे पत्र सुनेत्रा पवार मागे घेणार असल्याचे समजते.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, यापुढे राष्ट्रीय कार्याध्यक्ष हेच पक्षाचे प्रमुख असतील, असे निवडणूक आयोगाला पत्र पाठविले होते.
मात्र सुनेत्रा पवार यांनी यावर 28 जानेवारी (अजित पवार यांच्या निधनाचा दिवस) ते 10 मार्च या कालावधीत झालेले सर्व पत्रव्यवहार रद्द करण्यात यावे, असे निवडणूक आयोगाला तातडीने पत्र पाठविले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत न करता त्यांनी हे पत्र पाठविले होते. पण यामागे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांची महत्त्वाची भूमिका होती, अशी चर्चा आहे.
पटेल-तटकरे यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रानुसारच सुनेत्रा पवार यांच्या निवडीची प्रक्रिया, पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी तसेच त्यांच्या एबी फॉर्मवरील सह्या करण्यात आल्या. हे पत्र जर ग्राह्य धरले नाही तर या सर्व प्रक्रियांवरच प्रश्न उपस्थित होऊ शकते, ही बाब काही नेत्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या लक्षात आणून दिल्याचे समजते.
सुनेत्रा पवार यांचे पत्र सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये पक्षासाठी अडचणीचे ठरू शकते, अशी भीतीही व्यक्त होत आहे. अडचणीच्या या सर्व बाबी समोर आल्यानंतर सुनेत्रा पवारांचे पत्र मागे घेतले जाणार असल्याचे बोलले जात आहे.