मुंबई विद्यापीठ (File Photo)
मुंबई

Mumbai News : 20 वर्षांतील सर्वांत तीव्र सौर वादळाच्या रहस्याचा उलगडा

मुंबई विद्यापीठातील संशोधकांचे योगदान

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गेल्या मे 2024 मध्ये पृथ्वीवर आलेल्या गॅनन्स सुपरस्टॉर्म या दोन दशकातील सर्वांत शक्तिशाली सौर वादळामागील वैज्ञानिक कारण भारतातील संशोधकांनी स्पष्ट केले असून, या संशोधनात मुंबई विद्यापीठाचे संशोधकही सहभागी असल्याने विद्यापीठाने जागतिक अवकाश संशोधनात हातभार लावला आहे.

द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार मे 2024 मध्ये सूर्यावरून सलग अनेक मोठे सौर उद्रेक झाले. या उद्रेकांमुळे अवकाशात पृथ्वीच्या आकाराच्या सुमारे 100 पट, म्हणजे तब्बल 1.3 दशलक्ष किमीचा प्रचंड चुंबकीय पुनर्संयोजन प्रदेश निर्माण झाला. याच प्रक्रियेमुळे सौर वादळ अधिक तीव्रतेने पृथ्वीवर पोहोचले, ज्याचा उपग्रह संचलन, संप्रेषण व्यवस्था आणि पृथ्वीच्या चुंबकीय संरक्षण कवचावर मोठा परिणाम झाला. हा शोध भारताच्या आदित्य-एल1 मोहिम तसेच नासाच्या सहा अंतराळयानांनी मिळून गोळा केलेल्या डेटा व निरीक्षणांवर आधारित आहे.

संशोधनाचे नेतृत्व इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील डॉ. अंकुश भास्कर आणि त्यांचे विद्यार्थी शिबितोष बिस्वास यांनी केले. या कार्यात मुंबई विद्यापीठाचे प्रा. अनिल राघव यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असून त्यांच्या सहकार्याने पीएचडी विद्यार्थी अजय कुमार व कल्पेश घाग यांनी विश्लेषण व डेटा-अभ्यासात योगदान दिले. या सहभागामुळे जागतिक अवकाश संशोधनात भारताचे स्थान अधोरेखित झाले असल्याचे विद्वत्‌‍वर्तुळात मान्य करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT